मुंबई : रस्त्यावरील बेवारस वाहने हटवण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला असून ही वाहने तत्काळ हटवून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी बाह्य संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. बेवारस वाहने हटवण्याच्या कारवाईदरम्यान येत असलेल्या अडथळ्यावर तोडगा काढण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी वाहतूक पोलीस विभागसह पालिका मुख्यालयात एका संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. ‘बेवारस वाहनमुक्त रस्त्यां’साठी उत्तम प्रयत्नांसोबतच प्रसंगी कठोर कारवाईसुद्धा करावी, असे निर्देश भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
मुंबईमध्ये बेवारस वाहनांचा प्रश्न मोठा बिकट बनला आहे. वाहनांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर जुन्या बेवारस व भंगारात काढलेल्या वाहनांचीही संख्या वाढत आहे. गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या किंवा जुन्या गाड्या अशाच सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर सोडून देण्यात येतात. या गाड्या रस्त्याच्या कडेला, पुलाखाली अशाच उभ्या असतात. अशा वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते, रस्त्यावर अतिक्रमण होते. तसेच पावसाळ्यात या वाहनांमध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे अशी वाहने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत हटवली जातात. ही वाहने हटवण्यासाठी मुंबई महापालिकेने बाह्य संस्थेची नेमणूक केली आहे. ही संस्था आणि प्रशासकीय विभागस्तरावरील प्रशासन यांनी योग्य समन्वय साधून रस्त्याच्या कडेला असलेली बेवारस तथा निकामी / भंगार वाहने तत्काळ निष्कासित करून त्यांची विल्हेवाट लावावी, असे निर्देश भूषण गगराणी यांनी दिले.
मुंबईतील बेवारस तथा निकामी / भंगार वाहनांविरोधात अधिक तीव्रतेने आणि जलद पद्धतीने कारवाई करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर मे २०२५ पासून बाह्य संस्था नेमली आहे. सुरू केलेल्या कारवाईचा आढावा, कारवाईदरम्यान येत असलेले अडथळे तथा उपाययोजनांसंदर्भात मुंबई महानगरपालिका मुख्यालयात बुधवारी बैठक पार पडली. त्यावेळी गगराणी यांनी वरील निर्देश दिले. या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, सह पोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे, उपायुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड यांच्यासह विविध परिमंडळांचे उपायुक्त, सर्व प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त, प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) गिरीश निकम, उप प्रमुख अभियंता महेंद्र अग्रवाल आदी उपस्थित होते.
निकामी / भंगार वाहनांसोबतच इतर प्रकारचे अनधिकृत टाकाऊ साहित्यही तत्काळ निष्कासित करावे. आवश्यक त्या ठिकाणी कारवाईसाठी पोलीस प्रशासनाचे सहकार्य घेऊन विशेष मोहीम आयोजीत करावी. बेवारस व भंगार वाहनांविरोधातील कारवाईसंदर्भात पोलीस, कंत्राटदार आणि महानगरपालिका प्रशासन यांच्यातील समन्वयासाठी प्रत्येक प्रशासकीय विभाग स्तरावर समन्वय अधिकाऱ्यांची (नोडल ऑफिसर) नेमणूक करावी, असे निर्देशही गगराणी यांनी यावेळी दिले.