मुंबई: माहीमच्या समुद्रातील अनधिकृत बांधकाम जिल्हाधिकारी कार्यालयाने गुरुवारी सकाळी कारवाई करून हटवले. पोलीस बंदोबस्तात आणि पालिकेच्या पथकाची मदत घेऊन ही कारवाई पूर्ण करण्यात आली आहे. माहीमच्या समुद्रात अनधिकृतपणे दर्गा बांधण्यात येत असल्याचे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या भाषणात नमूद केले होते. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा >>>माहीमच्या समुद्रातल्या ‘त्या’ बांधकामावर प्रशासनाकडून कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांनंतर पालिकेचं मोठं पाऊल!

माहीमच्या समुद्रात अनधिकृतपणे दुसरा हाजीअली दर्गा बांधत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी कालच झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात केला होता. त्याबाबतची चित्रफितही दाखवली होती. ही मजार अनधिकृत असून ती तोडण्यात यावी. हे बांधकाम तोडले नाही तर आम्ही तेथे गणपतीचे मंदिर उभे करु, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर सरकारी यंत्रणा कामाला लागल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाने रात्रीच आदेश काढून हे बांधकाम पाडून टाकण्याबाबत पावले उचलली. सकाळी आठ वाजता पोलीस आणि पालिकेच्या जी उत्तर विभागाच्या पथकाची मदत घेत हे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले.

हेही वाचा >>>“मुख्यमंत्रीपदी मिंधे व उपमुख्यमंत्रीपदी ‘होयबा’…”, ठाकरे गटाची शिंदे-फडणवीसांवर परखड टीका!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई महानगर पालिकेचे पथक गुरुवारी सकाळीच माहीम परिसरात पोहोचले. पालिकेचे अधिकारी आणि कामगारांनी पाडकामासाठी वापरण्यात येणारे मोठे हातोडे, दोरखंड आणि घमेली आणली होती. त्यामुळे माहीमच्या समुद्रातील अनधिकृत मजारीच्या परिसरातील चौथरा आणि इतर अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाचे सहा अधिकाऱ्यांचे पथक या कामगिरीसाठी तैनात करण्यात आले होते.