सध्या संपूर्ण जगावर करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनने दहशतीचं वातावरण निर्माण केलं असताना दक्षिण आफ्रिकेतून गेल्या १९ दिवसांत एक हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आल्याची धक्कादायक माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉन वेगाने फैलावत असल्याने संपूर्ण जगाला चिंता सतावत आहे. दक्षिण आफ्रिकेत करोनाच्या या नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध आणली आहेत. केंद्र सरकारसोबत राज्य सरकारने तेथून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध आणले असताना आदित्य ठाकरेंनी दिलेल्या माहितीने चिंता वाढवली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत ‘ओमिक्रॉन’ संदर्भात चिंता व्यक्त, उद्धव ठाकरे म्हणाले, “संसर्गाला वेळीच रोखण्यासाठी….”

आदित्य ठाकरे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून एक हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत. आतापर्यंत जे लोक आलेत त्यांची माहिती आपण मिळवली आहे. जे मुंबईत आहेत त्यांना पालिकेकडून फोन केले जात आहेत”. यासोबतच परदेशातून आलेल्या गेल्या १० दिवसांतील सर्वांना संपर्क साधून विचारपूस केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसंच संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था केली जात असल्याचंही ते म्हणाले आहेत.

करोनाच्या नव्या विषाणूसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त

करोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासंदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती नियमितरित्या मिळत राहावी, जेणेकरून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल व संसर्गाला वेळीच रोखण्यात यश मिळेल असं सांगितलं.

Omicron: महाराष्ट्रातील शाळा १ डिसेंबरला सुरु होणार का?; राजेश टोपेंचं मोठं विधान

ज्या देशांमध्ये पुन्हा एकदा करोनाचा उद्रेक झाला आहे तेथील लाट सर्वात मोठी असून फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रिया या देशांमध्ये दर दिवशी ३० हजारांपेक्षा जास्त लोक करोनाग्रस्त झालेले आढळत आहेत. ओमिक्रॉन विषाणुचे ५० पेक्षा जास्त म्युटेशन आहेत. सध्याच्या आरटीपीसीआर चाचणीत या व्हेरियंटची लागण असल्यास एस जिन आढणार नाही. सध्या तरी प्रतिबंधासाठी मास्क सर्वात जास्त आवश्यक आहे. केंद्र सरकारने १२ देशातल्या प्रवाशांची तेथून विमानात बसण्यापूर्वी ७२ तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी आवश्यक केली असून येथे उतरल्यावर परत एकदा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. तसंच सात दिवसांसाठी विलगीकरण आवश्यक आहे.

परदेशातून येणारे प्रवासी थेट मुंबईत किंवा महाराष्ट्रातील इतर विमानतळांवर न उतरता देशात इतरत्र उतरून नंतर देशांतर्गत विमानसेवेने किंवा रस्ते आणि रेल्वे मार्गे आल्यास त्यांची तपासणी कशी करणार हा सध्याचा प्रश्न असून पंतप्रधानांना देखील यासंदर्भात अवगत करण्यात यावे यावर बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशभरातील आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत विमानसेवांनी प्रवाशांची माहिती नियमितपणे एकमेकांना दिल्यास रुग्ण प्रवासी तसेच त्यांच्या संपर्कातील प्रवासी शोधणे सोपे जाईल असं सांगितलं.

मुख्यमंत्र्यासोबत बैठक

मास्क वापरणं गरजेचं आहे असं सांगत ओमिक्रॉनची लागण होण्याची गती सध्याच्या व्हेरियंटपेक्षा ५ पटीने जास्त आहे अशी माहिती राजेश टोपे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर दिली. यापुढे केंद्राने सांगितलेल्या १३ देशातून येणाऱ्या प्रवाशांना थेट विमानतळावर क्वारंटाईन केलं जाणार असून आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय विमान प्रवास करता येणार नाही असाही निर्णय घेतल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. औरंगाबाद, मुंबई, नागपूर पुणे या विमानतळावर देखील प्रवाशांच्या चाचण्या घेतल्या जातील असंही टोपे यांनी सांगितलं. मुंबईहून दिल्लीला जायचं असेल आणि तिथून पुन्हा मुंबईला यायचं असेल तरीही RTPCR चाचणी अहवाल निगेटिव्ह असायला हवा अशी माहिती देखील टोपे यांनी दिली.

विमान प्रवाशांची चाचणी

ओमिक्रॉनच्या धोक्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर सतर्कतेचा आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सायंकाळी करोना विषाणूच्या या नव्या उत्परिवर्तित प्रकाराचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बठक घेतली. या वेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, राज्याच्या टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच ओमिक्रॉन नावाचा करोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याने त्याचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनांची वाट न पाहता युद्धपातळीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा. टाळेबंदी नको असेल तर सर्व बंधने पाळावी लागतील, असे सांगत विमानतळावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर चाचणी करण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यभरातील प्रशासकीय यंत्रणेला दिला.

करोनाच्या ओमिक्रॉन या विषाणूचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने काळजी घ्यावी. परत एकदा संसर्गाचा वाढ झाली तर टाळेबंदी परवडणारी नाही. त्यामुळे परत टाळेबंदी लागू द्यायची नाही या निर्धाराने नियमित मुखपट्टी वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे अशी काही बंधने पाळावीत लागतील, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लशीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घेणे, आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.