मुंबई : राज्यभरात मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेती, फळपिके, बागायती पिके, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तब्बल ६४ हजार ६६१ हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहेत. नुकसान झालेल्या ठिकाणांचे पंचनामे सुरू आहेत. अमरावती, बुलढाणा जिल्ह्यांत सर्वाधिक नुकसान झाले आहे.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या सुरूवातीपासून अखेरपर्यंत राज्यात विविध भागात वळीव, पूर्वमोसमी पाऊस पडत राहिला. अखेरच्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली होती. पावसाचा सर्वाधिक फटका अमरावतीला बसला असून १४ हजार २८९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. बुलढाण्यात १४ हजार २१६, नाशिकमध्ये ६ हजार ९७७, अहिल्यानगरमध्ये ५ हजार १२३, अकोल्यात ४ हजार ५५०, जळगावात ४ हजार ५३८, सोलापुरात ४ हजार २२ आणि चंद्रपुरात १ हजार ८६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

आंबा, केळी, भाजीपाला पिकांना फटका

मुसळधार पावसामुळे  कोकण किनारपट्टीवर आंबा, काजू, उन्हाळी भात, चिक्कू पिकांचे नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात केळी, बाजरी, मका, डाळिंब, कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात आंबा, केळी, डाळिंब, भूईमूग, भाजीपाला, पपई पिकाला फटका बसला आहे. मराठवाड्यात भाजीपाला पिके, टोमॅटो, बटाटा. कांदा, मका, बाजरी, तीळ आणि विदर्भात उन्हाळी तीळ, मूग, उडीद, पपई, संत्रा, मोसंबी, लिंबू आणि भात पिकाचे नुकसान झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बहुपिक पद्धतीमुळे नुकसानीचा आकडा वाढला

राज्यात पूर्वी खरीप आणि रब्बी हंगामात पिके घेतली जात होती. रब्बी आणि खरीप पिकांची काढणी झाल्यानंतर शेतशिवारे रिकामी राहत होती. आता तशी स्थिती राहिली नाही. सिंचनाच्या सोयी वाढल्यामुळे फळपिके, बागायती पिके, भाजीपाला पिकांचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे पावसाचा फटका प्रामुख्याने आंबा. डाळिंब, पपई, केळी, संत्रा आदी फळपिकांना बसला आहे. उन्हाळी हंगामातील तीळ, भुईमूग, मूग, उडीद आणि भात पिकांचेही नुकसान मोठे आहे. त्यामुळे नुकसानीचा आकाडा ६५ हजार हेक्टरपर्यंत गेला आहे. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, त्यांना जास्तीत -जास्त भरपाई देण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली.