मुंबई : गेले काही दिवसांपासून वाढलेल्या उकाडय़ापासून आता दिलासा मिळणार आहे. राज्यातील कमाल तापमानात पुढील तीन दिवसांत हळूहळू चार ते सहा अंशापर्यंत घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई आणि उपनगरांनाही उकाडय़ापासून दिलासा मिळणार असून पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा आणि तुरळक भागांत पावसाच्या हलक्या सरीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाढलेले तापमान आणि आद्रता यांमुळे मुंबई आणि परिसरात उकाडा जाणवत होता. मात्र यंदा मोसमी पावसाचे आगमन काहिसे लांबण्याची शक्यता असली तरी आता काही प्रमाणात उकाडा कमी होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि परिसरातील पुढील पाच दिवसांत कमाल तापमानात दोन ते तीन अंशानी घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गुरुवारी हवा ढगाळ राहील तर शुक्रवारी तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान बुधवारी हवामान विभागाच्या सांताक्रुझ केंद्राने ३४.१ अंश सेल्सिअस तर कुलाबा केंद्राने ३४.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद केली. राज्यातील इतर भागातील तापमानही घटणार आहे. सध्या विदर्भ, मराठवाडय़ाती अनेक भागांत ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक कमाल तापमान आहे. मात्र पुढील पाच दिवसांत तापमानात हळूहळू घट होईल. देशातील अनेक भागांतील कमाल तापमानात ४ ते ६ अंशांची घट पुढील पाच दिवसांत होईल आणि त्यानंतर तापमान स्थिर राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.