नाशिक जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी शिवारात गळफास लटकवले
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाविरोधात आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आता सरकारने बळजबरीने जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यास थेट गळफास घेऊन आत्महत्या करण्याची तयारी केली आहे. नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली जमीन वाचविण्यासाठी हा जीवघेणा मार्ग निवडताना शेतात झाडांना दोरी बांधून गळफास तयार तयार केले आहेत. एवढेच नव्हे तर जबरदस्तीने मोजणी केल्यास आम्ही आत्महत्या करू आणि त्यास जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, अशा आशयाच्या चिट्ठय़ाही संबंधितांनी लिहिल्या आहेत. त्यामुळे समृद्धीविरोधातील शेतकऱ्यांचा लढा अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ठाणे जिल्ह्य़ातील भिवंडीपासून सुरू होणारा समृद्धी महामार्ग कसारा येथून नाशिक जिल्ह्य़ात प्रवेश करतो. या जिल्ह्य़ातील इगतपुरी व सिन्नर तालुक्यांतून हा मार्ग पुढे अहमदनगर जिल्ह्य़ात जातो. ठाणे जिल्ह्य़ात या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास विरोध केल्यानंतर सरकारने कल्याण आणि शहापूरजवळच्या स्मार्ट सिटी रद्द करून त्या अन्यत्र हलविण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे नाशिक आणि नगर जिल्ह्य़ातील स्मार्ट सिटीही शेतकऱ्यांच्या विरोधानंतर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्यानंतरही या महामार्गासाठी जमिनी देण्यास शेतकरी तयार नाहीत. उलट जीव गेला तरी चालेल पण काळ्या आईचा सौदा करणार नाही, अशी भूमिका नाशिक जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे भूसंपादनाचा तिढा कायम आहे. सिन्नर तालुक्यातील शिवडे गावात ७ एप्रिल रोजी झालेल्या प्रखर विरोधामुळे प्रशासनाला मोजणीचे काम बंद करावे लागले. त्या दिवशी दगडफेक करणाऱ्या जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यावेळी ताब्यात घेतलेल्या ४२ शेतकऱ्यांना ग्रामीण पोलिसांनी ‘चॅप्टर केस’ का दाखल करू नये, अशी नोटीस बजावली. त्यात मोजणीच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यास प्रतिबंध केला आहे. ही नोटीस न स्वीकारता शेतकऱ्यांनी त्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचे ठरविले. शहापूर येथे रास्ता रोकोद्वारे समृद्धी प्रकल्प रद्द न झाल्यास महाराष्ट्राचा सिंगूर होईल, असा इशाराही दिला गेला. दरम्यानच्या काळात प्रशासनाने संबंधित जमिनींच्या मालकी हक्काची निर्वेधता तपासण्यासाठी वकिलांचे पॅनल नियुक्त करण्यासंदर्भात निविदा मागविली. संमती नसताना प्रशासन पुन्हा पोलीस बळाचा वापर करून रखडलेली मोजणी करू शकते हे लक्षात घेऊन सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतात गळफास तयार करीत वेळप्रसंगी टोकाची भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. काहीही झाले तरी तालुक्यात मोजणी होऊ द्यायची नाही आणि मोबदल्यावर देखील चर्चा करायची नाही, असे सर्वानी निश्चित करीत आत्महत्येची तयारी ठेवल्याचे शिवडेतील शेतकरी सोमनाथ वाघ आणि सोनांब्याचे शहाजी पवार, नवनाथ भैरू वाघ यांनी सांगितले. या गावाच्या शिवारात ठिकठिकाणी झाडांना फास लटकविण्यात आले असून मोजणीसाठी पोलीस आणि महसूल अधिकारी आल्यास सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा ग्रामस्थानी दिला आहे. एवढेच नव्हे तर आपल्या आत्महत्येस जिल्हा प्रशासन जबाबदार राहील अशा चिठ्ठय़ाही लिहिल्या आहेत. एप्रिलच्या प्रारंभी झालेल्या गोंधळानंतर फौजदारी कारवाईची नोटीस बजावणे, गावातील घडामोडींवर पोलिसांनी पाळत ठेवण्याचे प्रकार घडत असल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत. यामुळे अनेकांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य बिघडले आहे. कोणत्याही स्थितीत एक इंचही जागा द्यायची नसताना मोजणीचा प्रयत्न केल्यास गळफास घेतला जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. या संदर्भात संघर्ष समितीचे पदाधिकारी राजू देसले यांनी शासन व भाजपचे पदाधिकारी ८० टक्के शेतकऱ्यांची संमती असल्याची दिशाभूल करणारी माहिती पसरवीत आहे. बळाचा वापर करून मोजणीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधितांना रोखण्यासाठी शेतांमध्ये दोरीचे गळफास लावल्याचे नमूद केले.