मुंबई : सकाळ आणि सायंकाळच्यावेळी लोकलमधील प्रवाशांची गर्दी जीवघेणी ठरत आहे. भरगच्च लोकलमध्ये शिरण्यास जागा नसली तरी प्रवासी लटकून प्रवास करतात. मर्यादित लोकल फेऱ्या धावत असल्याने, प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यास अडचणीचे ठरत आहे. लोकल गाड्या दररोज विलंबाने धावत असल्याने, विलंबाचा फटका प्रवाशांच्या जीवावर बेतला आहे. मुंब्रा येथे लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या प्रवाशांची लोकल विलंबाने धावत होती. त्यामुळे या लोकलमध्ये गर्दीचे प्रमाण अधिक होते, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले. तसेच रेल्वेकडून लोकलपेक्षा एक्स्प्रेस गाड्या सोडण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याने लोकल उशिरा धावत असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले.
मध्य रेल्वेवरून दररोज सुमारे ३५ ते ४० लाख प्रवासी प्रवास करतात. महत्त्वाच्या स्थानकांतून ३ ते ४ लाख प्रवाशांचा प्रवास होतो. मध्य रेल्वेवर सकाळी आणि सायंकाळी ८३ टक्के प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे यावेळी अपघातांच्या घटना अधिक होतात. सोमवारी सकाळी ७.२२ ची कसारा-सीएसएमटी लोकल सुटली असता ती गाडी वेळापत्रकानुसार ठाणे येथे सकाळी ८.५८ वाजता पोहचणे अपेक्षित होते. परंतु, त्या लोकलला विलंब झाल्याने, दिवा रेल्वे स्थानकातील बरेच प्रवासी या लोकलमध्ये चढले. त्यामुळे या लोकलमधील प्रवाशांची संख्या वाढली. त्यानंतर दिव्यावरून ही लोकल सुटल्यानंतर सकाळी ९.१० वाजता मुंब्रा येथे लोकलमधून १३ प्रवासी पडले. या दुर्घटनेत ४ प्रवाशांचा मृत्यू झाला.
रेल्वे मार्गात अपघात किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास लोकल खोळंबा होतो. त्यामुळे लोकलचा वक्तशीरपणा बिघडून, पुन्हा एकाच लोकलमध्ये दोन ते तीन लोकलमधील प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे गर्दीचा फुगवटा वाढतो. मध्य रेल्वेवरील वाढत्या गर्दीची कोंडी फोडण्यासाठी, वाढीव लोकल फेऱ्या चालवणे सध्या अशक्य आहे. तसेच अनेक प्रकल्पाचे काम सुरू असून ते पूर्ण होण्यास विलंब आहे.
३५ हजार लोकल विलंबाने
मध्य रेल्वेवरून दररोज १,८१० लोकल फेऱ्या धावण्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनाकडून केला जातो. मात्र, यामधील बहुसंख्य लोकल फेऱ्या रद्द होतात. तर, अनेक लोकल उशिराने धावतात. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये जानेवारी २०२५ पर्यंत सुमारे ३५ हजार लोकल फेऱ्या विलंबाने धावल्या होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मेल, एक्स्प्रेसमुळे लोकल सेवा विस्कळीत
भारतीय रेल्वेच्या इतर विभागातून विलंब झालेल्या मेल, एक्स्प्रेस मुंबई विभागात अवेळी येतात. या अवेळी लोकलला उचित मार्ग तयार करताना, लोकल फेऱ्यांना फटका बसतो. लोकल ऐवजी रेल्वेगाड्यांना प्राधान्य दिल्याने लोकलचे वेळापत्रक कोलमडून जाते. २०२४-२५ या आर्थिक वर्षात सुमारे ४ हजार लोकल फेऱ्या बाहेरगावच्या रेल्वेगाड्यांमुळे उशिराने धावल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कार्यालयीन वेळा बदल्याचा उपक्रम थंडावला
मध्य रेल्वे प्रशासनाकडून ‘शून्य मृत्यू’ मोहिमेअंतर्गत कार्यालयीन वेळा बदलण्यासाठी मुंबईतील स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारी, निमसरकारी, महापालिका, खासगी कार्यालयांशी पत्रव्यवहार पाठवले. याबाबत या संस्थांनी मध्य रेल्वेला सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे तत्कालीन विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी मुंबईतील संस्थांशी पत्रव्यवहार करून, कार्यालयीन वेळा बदलण्याची विनंती केली. या पत्राला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. परंतु, काही महिन्यात गोयल यांची बदली झाल्यानंतर कार्यालयीन वेळा बदल्याचा उपक्रम थंडावला आहे. तसेच अनेक संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन देखील, त्यांच्या कार्यालयीन वेळेत कोणताही बदल केला नसल्याची माहिती मिळत आहे.