मुंबई : पूर्व आणि पश्चिम उपनगरातील पाणीपुरवठा बुधवारी तब्बल ३० तासांसाठी बंद राहणार आहे. नवीन २४०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी बुधवार, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते गुरुवार, ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ३० तासांच्या कालावधीत भांडूप, कुर्ला, अंधेरी ते वांद्रे पूर्व भाग आणि धारावी, दादर येथील काही परिसरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जलबोगदादरम्यान मुंबई महानगरपालिकेमार्फत नवीन २४०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे १८०० मिलीमीटर व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम या दोन जलवाहिन्या अंशतः खंडित करून नवीन २४०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. बुधवार, ५फेब्रुवारी सकाळी ११ पासून गुरुवार, ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ पर्यंत म्हणजेच एकूण ३० तास, जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम सुरू राहणार आहे. या कालावधीत पालिकेच्या एस, एल, के पूर्व , एच पूर्व, आणि जी उत्तर विभागांतील काही परिसरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या परिसरातील नागरिकांनी, पाणीपुरवठा बंद असण्याच्या अगोदरच्या दिवशी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा. तसेच, पाणीपुरवठा बंद असलेल्या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करावा. जलवाहिनीच्या कामानंतर पुढील काही दिवस गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, तसेच महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.