मुंबई : राज्यातील यंदाच्या मोसमी पावसाच्या हंगामात शुक्रवारपर्यंतच्या (२० जून) आकडेवारीनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भात चांगला पाऊस झालेला नाही. राज्यातील इतर भागाच्या तुलनेत कोकणात जास्त पाऊस पडतो. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक असते. तर या तुलनेत पालघर, मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यांत कमी पाऊस पडतो.

यंदा मोसमी पावसाच्या सुरुवातीच्या टप्प्यात कोकणात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोकणात १ ते २० जून या कालावधीत सरासरीच्या ३७ टक्के जास्त पाऊस झाला आहे. तर मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या ३८ टक्के जास्त पाऊस झाला आहे.

कोकणात २० जूनपर्यंत ५३४.३ मिमी, तर मध्य महाराष्ट्रात १२८.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. साधारण या कालावधीत कोकणात ३९१ मिमी, तर मध्य महाराष्ट्रात ९३.३ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. यंदा राज्यात मोसमी पाऊस लवकर दाखल झाला. त्यानंतर पावसाचा जोर प्रामुख्याने कोकणात सर्वाधिक होता. रत्नागिरी, रायगड, तसेच सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मागील २० दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद सरासरीपेक्षा कमी नोंदली गेली आहे. विदर्भात २० जूनपर्यंत ५७ टक्के कमी पाऊस झाला आहे. तर मराठवाड्यात ३९ टक्के कमी पावसाची नोंद आहे. या कालावधीत साधारण विदर्भात ९३.३ मिमी तर, मराठवाड्यात ८६.५ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. मागील काही दिवसांचा विचार करता मोसमी पाऊस दाखल झाला असला तरी कोकण आणि इतर काही भाग वगळता उर्वरित भागात पावसाचा जोर फारसा नव्हता. विदर्भात जून महिन्यातही कामल तापमान ४० अंशापुढे नोंदले जात होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात काही भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. तर काही भागात पाऊस कोसळत आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवसांसाठी विविध भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार संपूर्ण कोकण, धुळे, नंदूरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर, अकोला, अमरावती, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकणात रविवार, सोमवार आणि मंगळवार जोरदार पावसाची शक्यता आहे.