मुंबई : मुसळधार पाऊस कोसळू लागताच दृश्यमानता कमी होऊन रेल्वेगाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे लागते. तसेच वीर – उडुपी दरम्यानच्या ६४६ किमी मार्गावर वेगमर्यादा लागू करण्यात येते. त्यामुळे पावसाळ्यात रेल्वेगाड्या कूर्मगतीने धावतात. दरवर्षी कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक १० जून ते ३१ ऑक्टोबर दरम्यान लागू होते. मात्र, यावर्षी पूर्वपावसाळी आणि अन्य पूर्ण झाल्याने कोकण रेल्वेने पावसाळी वेळापत्रकात सुधारणा केली आहे.
पावसाळी वेळापत्रक १० जूनऐवजी १५ जूनपासून लागू करण्यात येणार आहे. तर, पावसाळी वेळापत्रकाची मुदत २० ऑक्टोबरपर्यंतच असणार आहे. पावसाळी वेळापत्रकात १५ दिवस कमी केल्याने प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे. कोकण रेल्वेने कोलाड – ठोकूर दरम्यानच्या ७४० किमी पट्ट्यातील पूर्वपावसाळी कामे पूर्ण केली आहेत.
पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याचा धोका असतो. दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रेल्वेगाड्या खोळंबतात. तसेच मोठा रेल्वे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे यावर्षी कोकण रेल्वे प्रशासनाने धोकादायक वाटणाऱ्या दरडी काढून टाकण्याची कामे केली आहेत. यासह बोगद्याजवळ, दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळ्या बसविल्या आहेत. यासह संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावर ६३६ कर्मचारी २४ तास गस्तीवर असणार आहेत. आपत्कालीन स्थितीत तात्काळ मदत मिळावी यासाठी ठराविक अंतरावर अत्याधुनिक यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
कोकण रेल्वे मार्गावरील सर्व सिग्नल यंत्रणेसाठी एलईडी दिव्यांचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे दृश्यमानता अधिक होण्यास मदत होईल, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबरदरम्यान कोकण रेल्वेवर पावसाळी वेळापत्रक लागू होते. परंतु, यावर्षी हा कालावधी सुमारे १५ दिवसांनी कमी केला आहे. यावर्षी १५ जून ते २० ऑक्टोबर दरम्यान पावसाळी वेळापत्रक लागू असेल. त्यानंतर रेल्वेगाड्या नेहमीच्या वेगाने धावतील. पूर्व पावसाळी कामे चोख पार पाडल्याने, हा निर्णय घेतला आहे. – संतोष कुमार झा, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, कोकण रेल्वे
– बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव या तीन ठिकाणी २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार असून रेल्वेच्या सुरक्षित वाहतुकीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
– मुसळधार पाऊस कोसळताना रेल्वेगाडीचा वेग ताशी ४० किमी ठेवण्याच्या सूचना सर्व लोको पायलटना देण्यात आल्या आहेत.
– माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ, आणि उडपी येथे पर्जन्य मापक यंत्रणा असून अतिवृष्टी काळात ही यंत्रणा सूचना करेल.
– पुरासंबंधी धोका दर्शविणारी यंत्रणा मडगाव-वीरदरम्यानची काळी नदी, वीर-सापेदरम्यानची सावित्री नदी आणि चिपळूण-कामठेदरम्यानच्या वशिष्ठ नदीवर बसविण्यात आली आहे.
– वायूची गती मोजण्याची यंत्रणा रत्नागिरी-निवसरदरम्यान पनवल नदीच्या पुलावर, थिवी-करमळीदरम्यान मांडवी पुलावर, करमळी-वेर्णादरम्यान झुवारी पुलावर, होन्नावर-मानकीदरम्यान शरावती पुलावर अशा चार ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे.
– आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी असिडेन्ट रिलीफ मेडिकल व्हॅन रत्नागिरी आणि वेरना गोवा येथे तैनात ठेवण्यात आल्या आहेत . लोको पायलट आणि गार्ड यांना वॉकी टॉकी यंत्रणा पुरवण्यात आल्या आहेत. सॅटेलाईटसारखी अत्याधुनिक यंत्रणाही रिलीफ व्हॅनमध्ये सुसज्ज ठेवण्यात आली आहे.