मुंबई: भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेली अनेक वर्षे धर्माचा, राष्ट्रीय अस्मितांचा तसेच भोंगळ राष्ट्रवादाचा आपल्या सत्तेच्या राजकारणासाठी गैरवापर केला. यांचे हिंदुत्व हे इतर धर्मीयांचा द्वेष करणारे असून या तिरस्काराच्या तव्यावर सत्तेच्या भाकऱ्या थापल्या जात आहेत. मेट्रो स्थानकांच्या नावांपुढे कंपन्यांची नावे झळकवून भाजपने देवदेवतांचा बाजार मांडला आहे. हिंदूंच्या अस्मितेशी खेळत कार्पोरेट हिंदुत्वाचा खेळ सुरु केल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शनिवारी येथे केली.

गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सावंत यांनी मेट्रो स्थानकांच्या नावावरून भाजपवर जोरदार टीका केली. भाजपचे हिंदुत्व आता कार्पोरेट झाले असून पैशासाठी त्यांनी आपले देव, आराध्य दैवत आणि ज्यांनी देशासाठी मोठे योगदान दिले, त्यांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे आता कोटक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस केले आहे. सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनचे आता आयसीआयसीआय लोम्बार्ड, महालक्ष्मीचे एचडीएफसी लाईफ तर आचार्य अत्रे स्टेशनचे निप्पॉन एमएफ असे नामकरण केले आहे, अशी माहिती सावंत यांनी दिली.

आपल्या अस्मितांशी चालवलेला हा खेळ संताप आणणारा आहे. भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी यावर खुलासा करावा. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांना महाराजांच्या नावासमोर कोटक लावलेले चालते का, असा सवाल करीत काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्रातील जनता हा अपमान कदापि सहन करणार नाही, असा इशारा सावंत यांनी दिला. शेतकरी, मजूर, कामगार, महिला, बेरोजगारीचे प्रश्न असताना त्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजप नामकरणाच्या नावाखाली अस्मितेचे राजकारण करत आहे. इलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या, दिल्लीतील राजपथचे कर्तव्यपथ, रेसकोर्स रोडचे लोक कल्याण मार्ग नामकरण केले. परंतु देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु, गांधी यांच्या नावाची भाजपाला ऍलर्जी असल्याने सायन्स सेंटरच्या नावातून नेहरु आणि नॅशनल पार्क स्टेशनच्या नावातून संजय गांधी यांचे नाव वगळले आहे, असा आरोपही सचिन सावंत यांनी केला.

देशातील विमानतळे, बंदरे, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, सरकारी जागा कार्पोरेट्सना विकत आहेत. कार्पोरेटच्या हितासमोर भाजपने धर्म, अस्मिता आणि संस्कृतीवर पाणी सोडले आहे. सनातन धर्माच्या नावाने शंख फुंकणारे देवस्थानांची नावे विकत आहेत. यातून भाजपचे दांभिक हिंदुत्व दिसून येते. सत्तेसाठी अस्मितेचे राजकारण करणारा भाजपा सत्तेत आल्यानंतर मात्र तीच अस्मिता कार्पोरेट्सच्या पायी वाहतो, अशी टीका सचिन सावंत यांनी केली.