मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष तसेच राष्ट्रीय परिषदेच्या सदस्यांच्या निवडणुकीसाठी केंद्रीय संसदीय कार्य व अल्पसंख्याक विकासमंत्री किरेन रिजिजू यांची पक्षाने नियुक्ती केली आहे. विद्यमान कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी येत्या आठवडाभरात निवड केली जाणार आहे. मुंबई अध्यक्षपदाचा निर्णय अद्याप झालेला नाही.
भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने नवीन अध्यक्षांची निवड करण्याचे विधानसभा निवडणुकीनंतर स्पष्ट झाले होते. रविंद्र चव्हाण यांची प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड करून त्यांचीच प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार हे पक्षाने सूचित केले होते. गेली सहा महिने चव्हाण हे अध्यक्षपदी बढती मिळेल या आशेवर होते. पण पक्षाकडून नव्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीची घोषणा होत नव्हती. पक्षाने किरेन रिजिजू यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली. यानुसार रिजिजू हे आठवडाभरात मुंबईत येऊन नवीन अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पार पाडतील, असे सांगण्यात आले.
मंत्रिमंडळात समावेश झाला नाही तेव्हाच डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार हे निश्चित झाले होते. चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील मानले जातात. अध्यक्षपदी निवड होण्यापूर्वी त्यांची प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. कार्याध्यक्षपदावरून चव्हाण यांना अध्यक्षपदी बढती दिली जाईल. चव्हाण यांच्या निवडीची औपचारिकता असून, लवकरच ही प्रक्रिया पार पाडली जाईल.
प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय परिषदेच्या सदस्यांच्या निवडीसाठी निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई अध्यक्षांच्या निवडीवर पक्षाने अद्याप काही निर्णय घेतलेला नाही. मुंबई भाजपचे विद्यमान अध्यक्ष आशिष शेलार यांना मुंबई महानगरपालिका निवडणूक पार पडेपर्यंत अध्यक्षपदी कायम ठेवले जाईल, अशी शक्यता वर्तविली जाते.