IMD Maharashtra Rain Update: अरबी समुद्रात गुरुवारी निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानुसार कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पूर्व-मध्य अरबी समुद्रात उत्तर कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागात वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरुवारी या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे क्षेत्र उत्तरेकडे सरकताना त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्याचाच परिणाम म्हणून रविवारपर्यंत राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकणातील रत्नागिरी आणि रायगडमध्ये शुक्रवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यांत पावसाचा जोर दोन ते तीन दिवस कायम राहील. त्याचबरोबर सिंधुदुर्गातही सलग पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या कालावधीत ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहतील. त्याचबरोबर मराठवाड्यातील परभणी, बीड, नांदेड, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या भागांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच घाट परिसरातही अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, सातारा, अहिल्यानगर आणि कोल्हापूर परिसरात पूरजन्य परिस्थिती उद्भविण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पावसाचा अधिक जोर कुठे

मय्य महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. यामुळे कोकणातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी पाऊस राहील.

नैऋत्य मोसमी वारे एकाच जागी

नैऋत्य मोसमी वारे बुधवारपासून एकाच जागी असून गुरुवारपर्यंत त्यांनी प्रगती केलेली नाही. तरीही मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याने रविवारपर्यंत मोसमी वारे करेळमध्ये दाखल होतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मोसमी वारे दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात प्रगती करेल. मालदीव आणि कोमोरिनचा शिल्लक भाग व्यापेल आणि लक्षद्वीप, केरळ, तामिळनाडू आणि ईशान्यकडील राज्यांमध्ये काही भागात मोसमी वारे दाखल होतील. याचबरोबर बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग पुढील दोन तीन दिवसांत मोसमी वारे व्यापतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

वादळी वारा व पावसामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिल्यामुळे खोल समुद्रात गेलेल्या शेकडो मासेमारी बोटी किनारी परतल्या आहेत.