मुंबई : हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांतील महाराष्ट्रामधील हवामानाचा विस्तृत अंदाज जाहीर केला आहे. ६ जूनपासून ते ३ जुलैपर्यंतच्या काळात राज्यात बहुतांश भागांमध्ये पावसाची स्थिती सामान्य राहण्याची शक्यता असून राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे .हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पहिल्या आठवड्यात (६ ते १२ जूनदरम्यान) मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, तर कोकण आणि विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या आठवड्यात (१३ ते १९ जून) पूर्व विदर्भ आणि कोकणचा काही भाग सोडला तर राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. या आठवड्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्यासाठी वातावरण अनुकूल असण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. यानंतर तिसऱ्या आठवड्यात (२० ते २६ जून) दक्षिण मध्य महाराष्ट्र , मराठवाडा, कोकण, व विदर्भातील काही भाग सोडला तर इतर ठिकाणी चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. चौथ्या आठवड्यात (२७ जून ते ३ जुलै) पश्चिम महाराष्ट्र व कोकण वगळता इतर ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या चार आठवड्यांच्या अंदाजानुसार कोकण वगळता इतर भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत कोकणात पावसाचा फारसा जोर नसेल. मात्र, इतर भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसाने जूनच्या सुरुवातीपासून उघडीप दिली आहे. काही भागात हलक्या सरींचा अंदाज आहे. मात्र मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानुसार ठाणे, रायगड, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोसमी वारे मंदावलेलेच नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल आठवडाभरापासून मंदावली आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा ते पश्चिम बंगालपर्यंत मोसमी वारे दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रगती केलेली नाही. अरबी समुद्रातून २६ मेपासून, तर बंगालच्या उपसागरातून २९ मेपासून मोसमी वारे पुढे सरकलेले नाही. मुंबई, अहिल्यानगर, अदिलाबाद, पूरी आणि पूर्व भारतातील बालूरघाटपर्यंत मोसमी वाऱ्यांची सीमा गुरूवारीही कायम होती. मोसमी वारे अजूनही कमजोर असल्याने मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीसाठी वाट पहावी लागणार आहे.