मुंबई : पालघर जिल्ह्यात देहरजी नदीवर देहरजी मध्यम प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे आतापर्यंत ८० टक्के काम पूर्ण झाले असून २०२७ मध्ये प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने (केआयडीसी) केले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास प्रकल्पाची एकूण पाण्याची साठवण क्षमता ९५.६० दशलक्ष घनमीटर अशी होणार असून त्यातील ९३.२२ दशलक्ष घनमीटर म्हणजेच साधारण प्रतिदिन २५५ दशलक्ष इतकी पिण्याच्या पाण्याची साठवणूक होणार आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील विकासाला या प्रकल्पामुळे चालना मिळणार आहे.

कोकणताली जलसुरक्षेच्यादृष्टीने पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे गावाजवळून वाहणार्या पश्चिम वाहिनी वैतरणा नदीची उपनदी असलेल्या देरहजी नदीवर देहरजी मध्यम प्रकल्पा हाती घेण्यात आला आहे. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाकडून (केआयडीसी) या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. तर केआयडीसी आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून या प्रकल्पास आर्थिक मदत केली जात आहे. यासाठी केआयडीसी आणि एमएमआरडीएमध्ये करार झाला असून या करारानुसार एमएमआरडीएने २५९९.१५ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य या प्रकल्पासाठी केले आहे.

त्यानुसार एमएमआरडीएच्या अर्थसहाय्याने हा प्रकल्प पुढे जात आहे. माती आणि दगडांचा वापर करत बांधण्यात येणार्या या धरणाची, मध्यम प्रकल्पाती एकूण साठवण क्षमता ९५.६० दशलक्ष घनमीटर अशी असणार आहे. तर यातील पिण्याच्या पाण्याची साठवणूक क्षमता ९३.५५ दशलक्ष घनमीटर अशी असणार आहे. म्हणजे या धरणातून दिवसाला पिण्यासाठी २५५ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. या धरणाची लांबी २४५० मीटर तर उंची ७१.६० मीटर अशी आहे. गेटेड स्पिलवे असलेले मातीचे धरण असा या धरणाचा प्रकार आहे. तर स्पिलवे गेट्सचा आकार १२ मीटर x ६.५ मीटर (४ गेट्स) इतका आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा या धरणाचे आतापर्यंत ८० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे. तर उर्वरित काम पूर्ण करत या प्रकल्पाचे लोकार्पण २०२७ मध्ये करण्याचे नियोजन असल्याचेही एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे. त्यानुसार २०२७ ला हे धरण कार्यान्वित झाल्यास वसई-विरार महानगरपालिकेला प्रतिदिन १९० दशलक्ष लिटर पाणी राखवी ठेवले जाणार आहे. तर ग्रामीण भागांसाठी १५ दशलक्ष लिटर आणि सिडको पालघर क्षेत्रासाठी ५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जाणार आहे. एकूणच या प्रकल्पामुळे पालघर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तर विक्रमगड तालुकर्यातील ग्रामीण भागासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध होणार असल्याने या तालुक्याता सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. सामाजिक-आर्थिक वाढीला चालना मिळणार असल्याची माहिती महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी दिली.