मुंबई : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी ‘उच्चपदस्थ मध्यस्थी’चे आरोप झाल्याने चर्चेत आलेले राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) जालिंदर सुपेकर यांच्याकडील तीन विभागातील तुरुंगाचा उपमहानिरिक्षक पदाचा गेली अनेक वर्षे असलेला अतिरिक्त कार्यभार गुरुवारी तडकाफडकी काढून घेण्यात आला.
जालिंदर सुपेकर यांच्याकडे ‘विशेष पोलीस महानिरीक्षक, मुख्यालय, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे’ या पदाचा नियमित कार्यभार आहे. त्याचबरोबर कारागृह विभागातील ‘कारागृह उप महानिरीक्षक’ या संवर्गातील पाच पदांपैकी रिक्त असलेल्या तीन पदांचा (नाशिक विभाग, मध्य विभाग- छत्रपती संभाजीनगर आणि पूर्व विभाग- नागपूर) अतिरिक्त कार्यभार होता. आता शासनाने सुपेकर यांच्याकडून अतिरिक्त कार्यभार काढून घेतला आहे. ही जबाबदारी अनुक्रमे अरुणा मुगटराव, वैभव आगे आणि स्वाती साठे या तुरंग अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली.
वैष्णवीचे पती शशांक हगवणे यांचे सुपेकर हे मामा लागतात. वैष्णवीची तक्रार पोलिसांनी नोंद करू नये यासाठी सुपेकर यांनी पुणे पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. तसेच सुपेकर यांनी कारागृहांसाठी लागणाऱ्या वस्तू केंद्रीय पद्धतीने घेऊन चढ्या दराने वस्तू खरेदी करत पुरवठादाराला लाभ मिळवून दिला. यामध्ये १०२ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला होता.
‘अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचे कारण काय?
राज्यात ६० मोठे, ९ मध्यवर्ती आणि २८ जिल्हा तुरुंग आहेत. सुपेकर हे मूळचे पोलीस दलातील आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्याकडे विशेष पोलीस महानिरीक्षक, मुख्यालय (कारागृह ) हे तुरुंग विभागातील दुसऱ्या क्रमांकाचे पद आहे. आश्चर्य म्हणजे सुपेकरांच्या पदांपेक्षा कनिष्ठ संवर्गातील म्हणजे ‘कारागृह उपनहानिरिक्षक’ पदाचा तीन-तीन अधिकाऱ्यांचा अतिरिक्त कारभार कसा काय, सोपवण्यात आला याचे आश्चर्य आहे.