लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : लोकल रेल्वे रुळावरून घसरण्याच्या एकाच आठवड्यातील दोन घटनांमुळे सोसाव्या लागलेल्या त्रासातून मुंबईकर प्रवासी सावरत असतानाच गुरुवारी मध्य रेल्वेने वेगमर्यादेचा ‘जाच’ लागू करून त्यांचे हाल मागील पानावरून पुढे चालू ठेवण्याची ‘दक्षता’ घेतली.

मध्य रेल्वेने गुरुवारी सकाळपासूनच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)पासून लोकलगाड्यांसाठी वेगमर्यादा लागू केली. परिणामी प्रवासाचा कालावधी वाढला आणि मुख्य, हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. एकामागोमाग एक उभ्या राहिलेल्या लोकल जागच्या हलेनात म्हटल्यावर अनेक प्रवाशांनी जीव धोक्यात घालून रेल्वे रुळांवर उड्या घेतल्या आणि पायपीट चालू केली, तर काहींनी जवळचे रेल्वे स्थानक गाठून बस, टॅक्सीचा खर्चीक पर्याय निवडून इच्छित ठिकाण वा आपले कार्यालय गाठले.

गेल्या तीन दिवसांत एक दिवसाआड दोनदा लोकल रेल्वे रुळावरून घसरली. रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे हजारो प्रवाशांच्या जीवास धोका निर्माण झाला. ‘सीएसएमटी’च्या फलाट क्रमांक दोनवर (हार्बर मार्ग) सोमवारी लोकल रेल्वे रुळावरून घसरली. मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांच्यासह वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री दुर्घटना स्थळाची पाहणी केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बुधवारी दुपारी ४.१३ वाजता त्याच ठिकाणाजवळ लोकल पुन्हा रुळावरून घसरली. मात्र, ही ‘लोकल पाडून पाहण्या’ची चाचणी होती, अशी सारवासारव मध्य रेल्वे प्रशासनाने केली. या दोन्ही घटनांमुळे प्रवासी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत असतानाच गुरुवारी सकाळी लोकलच्या विलंबाने त्यात आणखी तेल ओतले.

हेही वाचा >>> ठाकरे, पवार यांना धडा शिकवायलाच हवा होता !

हार्बर मार्गावरील कुर्ला ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान ठिकठिकाणी एकामागेएक लोकल उभ्या होत्या. सकाळी कॉटनग्रीन येथे एका पाठोपाठएक अशा चार लोकल उभ्या होत्या. कल्याण, कसारा, कर्जतकडून सीएसएमटीला येणाऱ्या सर्वच लोकल विलंबाने धावत होत्या.

ठाण्यावरून सीएसएमटीकडे येण्यास निघालो होतो. मात्र, स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. तसेच जलद, धिम्या सर्व लोकल ३० ते ३५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. लोकलमध्ये बसल्यानंतर उन्हाचा दाह सहन करावा लागला, असे एका प्रवाशाने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उशिराने शहाणपण!

लोकल सोमवारी घसरल्यानंतर दुर्घटनास्थळानजीक वेगमर्यादा ताशी ३० किमीवरून १५ ते २० किमी करणे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक होते. मात्र मध्य रेल्वेने तेथील वेगमर्यादा ताशी ३० किमी कायम ठेवली. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध झाल्यानंतर अखेर गुरुवारी मध्य रेल्वे प्रशासनाने वेगमर्यादा लागू केली.