लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मागील दोन दिवसांपासून वाढत असलेल्या तापमानात बुधवारी घट झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. अचानक वाढलेल्या तापमाानामुळे मागील दोन दिवस मुंबईकर हैराण झाले होते. मुंबईच्या तापमानाचा पारा घसरला असला, तरी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे उकाडा कायम आहे. दरम्यान, पुढील तीन – चार दिवस उन्हाचा तडाखा जाणवणार नाही. मात्र, आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागणार आहे.

तापमानात घट झाल्यामुळे बुधवारी मुंबईत उन्हाची तीव्रता कमी होती. मात्र, आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे तापमानात घट झाल्यानंतरही उष्मा जाणवत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३२.८ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ येथे ३३.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कुलाबा केंद्रावरील तापमान मंगळवारच्या तुलनेत १.३ अंशानी कमी नोंदले गेले. तर सांताक्रूझ येथील २.४ अंशानी कमी नोंदले गेले. मुंबई, तसेच उपनगरांत पुढील तीन – चार दिवस कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअस दरम्यान असेल. मात्र हवेतील उष्मा कायम राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

या कालावधीत आर्द्रतेचे प्रमाण ८० ते ८५ टक्क्यांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. यामुळे विशेषत: सकाळी व सायंकाळी अधिक घाम येऊ शकतो. सामान्यत: एप्रिल महिन्यात उष्णतेचा पारा चढतो, मात्र यंदा आर्द्रतेत होणारी वाढ ही मुंबईकरांसाठी अधिक त्रासदायक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे. मागील दोन दिवस उकाडा आणि उन्हाचा ताप यामुळे मुंबईकर हैराण झाले होते. तापमानात बुधवारी घट झाल्यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान, पुढील चार ते पाच दिवस राज्यात समिश्र हवामान राहील. या कालावधीत काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, तर काही भागात उष्ण व दमट वातावरण राहील.

विदर्भात वादळी पावसाचा इशारा

राज्यात एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दक्षिण मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून विदर्भ, मराठवाडा ते कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ही प्रणाली पोषक ठरत असल्याने राज्यात अनेक भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाचे वातावरण निवळल्यानंतर उन्हाचा चटका वाढणार

पावसाचे वातावरण निवळल्यानंतर राज्यात उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात गुरुवारी आणि शुक्रवारी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे. तर, जालना हिंगोली, नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी, शनिवारी उष्ण व दमट वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.