मुंबई: नागपाडा परिसरात दुचाकीवरून आलेल्या चौघांनी सराफाच्या पेढीतील दोन कर्मचाऱ्यांना अडवून त्यांच्याकडील सुमारे तीन किलो सोने लुटल्याची घटना गुरूवारी घडली होती. गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी केलेल्या कारवाईत १२ तासांत म्हणजे शुक्रवारी पाच जणांना अटक करण्यात आले. आरोपींनी दीड किलो वजनाचे लगड व दीड किलो वजनाचे सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढला होता. आरोपींकडून सर्व म्हणजे दोन कोटी ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

विनायक अजय दळवी, शहनवाज हुसैन खान, मंगेश पंढरीनाथ शिंदे, अब्दुल हकीम अब्दुल कादीर शेख व संतोष जैन अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील विनायक हा कुर्ला, शहनवाज हा शिवडी, मंगेश हा कुर्ला, अब्दुल हा नागपाड्यातील रहिवासी आहे. आरोपीनी झटपट श्रीमंत होण्यासाठी तसेच कर्ज फेडण्यासाठी हा साहसी दरोडा घातला होता. त्यातील संतोष जैन हा यापूर्वी चोरी झालेल्या सोन्याच्या पेढीत कामाला होता. याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना गुरूवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास नागपाड्यातील डायना पुलावर ही घडली. त्यात सराफ पेढीत कार्यरत दोन कर्मचारी लोअर परळ येथील दागिने निर्मिती करणाऱ्या युनिटमध्ये सोने घेऊन जात होते. आरोपी बऱ्याच काळापासून त्याचा पाठलाग करत होते. डायना पुलावर पोहचताच आरोपींनी त्यांच्या दुचाकीसमोर आपली दुचाकी उभी केली. त्यांना अडवल्यानंतर दुचाकीवर मागे बसलेल्या आरोपीने उतरून कर्मचाऱ्याच्या हातातील बॅग हिसकावली. त्याच्या मदतीसाठी आणखी एका दुचाकीवरून आले होते. त्यानंतर त्यांनी दुचाकीची चावीही काढून घेतली. त्यामुळे दोन्ही कर्मचाऱ्यांना आरोपींचा पाठलाग करता आला नाही. आरोपींनी तेथून पलायन केले. तक्रारदार कर्मचाऱ्यांनी तात्काळ आपले मालक व काळबादेवी येथील दुकानाला याबाबत माहिती दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर नागपाडा पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप काळे व गुुन्हे शाखेच्या पथकांनी मुंबई सर्वत्र नाकाबंदी करून दुचाकीस्वारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे गुन्हे शाखेकडूनही प्रकरणी समांतर तपास करण्यात आला पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपींना कर्मचाऱ्यांच्या मार्गाची माहिती होती. त्यामुळे परिचीत व्यक्तीचे हे काम असावे, असा संशय होता. तसेच आरोपी अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा पाठलाग करत असल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलीसांनी घटनास्थळ आणि मार्गावरील सर्व सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यावेळी आरोपींची माहिती मिळाली. त्या आधारे पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली. आरोपी जैन यापूर्वी या सराफ व्यापाऱ्याकडे कामाला होता. त्यानेच आरोपींना संपूर्ण माहिती दिली.