विकास महाडिक

मुंबई : राज्याच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारी पाच हजारपेक्षा अधिक अभ्यागतांनी मंत्रालयाला भेट दिली.  सोमवार ते बुधवार या तीन दिवसांत या वाढत्या गर्दीने पोलिसांवरील ताण वाढला असून अनेक वेळा अभ्यागत आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमकी झडत असल्याचे चित्र आहे.

 मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी चार मार्ग आहेत. जनता जनार्दन (जे. जे. ) नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्रवेशद्वारातून यापूर्वी नागरिकांना प्रवेश दिला जात होता. या प्रवेशद्वाराजवळ मुख्य रस्ता असल्याने अपघाताच्या शक्यतेने  आता मंत्रालयीन वाहनांसाठी  राखीव ठेवण्यात आला आहे.  मंत्रालयाच्या मागील बाजूस असलेल्या उद्यान प्रवेशद्वारातून दुपारी १२ वाजेपर्यंत जेष्ठ नागरिक व अपंग अभ्यागतांना प्रवेश दिला जात आहे. ही संख्या  १०० ते १५०च्या घरात असल्याचे पोलिसांनी सांगितले.   दुपारी दोन ते पाच या दरम्यान मोठय़ा प्रमाणावर गर्दी होते.  अलीकडे  सरासरी पाच ते साडेपाच हजार जण भेट देत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते.

 सुरक्षेच्या कारणास्तव केवळ उद्यान प्रवेशद्वारातून अभ्यागतांना प्रवेश दिला जात आहे. ही संख्या जास्त असल्याने उद्यान प्रवेशद्वार ते मुख्य रस्त्यापर्यंत ही रांग लागत असून त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा करण्यात आलेली नाही.  अनेक नागरिकांना या रांगेत तासनतास ताटकळत प्रवेशाची वाट पाहावी लागत आहे. मंत्रालयाच्या मागील बाजूच्या दक्षिण (आरसा) प्रवेशद्वार हे केवळ मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसाठी आहे. अभ्यागतांसाठी उद्यान प्रवेशद्वाराजवळ दहा प्रवेशिका खिडक्या आहेत. येथे असलेली छोटी रांग पार करून प्रवेशिका मिळवावी लागत आहे. वास्तविक मंत्रालयातील गर्दी कमी करण्याचे अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. तरीही बदल्या, बढत्या वा सरकारी कामे मिळविण्यासाठी मंत्र्यांकडे होणारी गर्दी  कमी होत नाही. काही आमदार पाच ते दहा कार्यकर्ते बरोबर घेऊन मंत्रालयात फिरत असतात. मंत्र्यांच्या दालनातही प्रचंड गर्दी होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्रालयातील प्रवेश प्रक्रिया अधिक सुटसुटीत करण्याचा प्रयत्न आहे. प्रवेशिकांसाठी गर्दी होऊ नये म्हणून ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा नागरिकांनी वापर करावा. – प्रशांत परदेशी, पोलीस उपायुक्त, मंत्रालय सुरक्षा