मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू आगामी महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येणार अशी चर्चा सुरू असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची गुरुवारी सकाळी एका पंचतारांकित हाॅटेलात भेट घेतल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. फडणवीस यांच्या राजकीय खेळीमुळे ठाकरे बंधूंमध्ये होणाऱ्या संभाव्य युतीच्या चर्चेला खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घेतलेल्या भेटीत शिवसेनेबरोबर (एकनाथ शिंदे) युती करण्याचा प्रस्ताव ठेवला असल्याचे समजते. महायुतीपेक्षा शिवसेना शिंदे आणि मनसेने युती करून एकत्र लढावे, अशी भाजपची योजना आहे. त्यातच गेले काही दिवस उद्धव व राज ठाकरे यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आणि उद्धव ठाकरे यांनीही त्यादृष्टीने सकारात्मक वक्तव्ये केली होती. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नवी मुंबईत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा फटका बसण्याची भीती आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत, असे भाजपचे प्रयत्न आहेत.

राजकीय लाभ होऊ नये म्हणून…

भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही राज ठाकरे यांच्याबरोबर थेट युती करून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी महापालिकांमध्ये काही जागा सोडण्याची तयारी नाही. त्याऐवजी शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर मनसेची युती घडविल्यास शिंदेंबरोबर ‘ठाकरे’ घराण्यातील नेत्याची साथ आहे, असे राजकीय चित्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार करता येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिंदेंबरोबर मनसे गेल्यास त्यांच्या कोट्यातील जागा सोडल्या जातील आणि मनसेचा राजकीय लाभ काही भागातील मराठी मतांसाठी भाजपसह महायुतीला होईल. त्याचबरोबर ठाकरे बंधूंची युती होऊन उद्धव ठाकरे यांचा राजकीय लाभ होऊ नये, यासाठी फडणवीस यांनी ही राजकीय खेळी केली असल्याची चर्चा सुरु झाली आहे.