मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर- माणगाव बायपास रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची कोंडीतून सुटका होणे आवश्यक आहे. त्यासाठी पर्यायी मार्गांच्या रुंदीकरण आणि दुरुस्तीसाठी आवश्यक १५ कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल. ही कामे पूर्णत्वास नेण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी येथे दिले.
मोरबा रोड ते मुंबई-गोवा महामार्ग रस्ता, साईनगर कालवा पूल ते उत्तेखोल कालवा गावापर्यंतचा रस्ता आणि निजामपूर रोड कालवा ते भादाव रस्ता हे माणगाव नगरपंचायत हद्दीतील तीन रस्ते आणि इंदापूर कॅनल रस्ता ते विगवली फाटा रस्ता, अशा चारही रस्त्यांच्या इंदापूर व माणगाव बायपास रस्त्यांच्या कामासंदर्भात पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले होते.
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, सचिव राजेश कुमार, तसेच इतर या वेळी उपस्थित होते.