मुंबई : आगामी काळात होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या दृष्टीने शिर्डी हे महत्त्वाचे विमानतळ असून ते पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी नुतनीकरण व विस्तारीकरणाची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे दिले.
शिर्डी व पुरंदर विमानतळाच्या कामाचा आढावा फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलरासू, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे आदी उपस्थित होते.
शिर्डीतील विमानतळावरील नवीन एटीसी इमारत, एकात्मिक मालवाहतूक इमारत, टर्मिनल इमारतीची कामे कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे. ही कामे संथगतीने सुरू असून ती वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक वाटल्यास अतिरिक्त मनुष्यबळ वापरावे. तसेच विमानतळासाठी आवश्यक असणारी खरेदी व स्ट्रक्चरल डिझाईनची कामे येत्या आठवड्यात पूर्ण करावीत, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या. शिर्डी हे मुंबई व नवी मुंबई विमानतळाच्या जवळचे विमानतळ आहे. येथील लहान विमाने पार्किंगसाठी शिर्डी विमानतळाचा वापर होऊ शकतो. त्यादृष्टीने आतापासूनच शिर्डी विमानतळावर सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक असल्यास आणखी जमीन संपादित करावी, असे निर्देश फडणवीस यांनी दिले.
पुरंदर विमानतळासाठी तातडीने भूसंपादन करावे
पुरंदर विमानतळासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे आता या विमानतळासाठी लागणारी जमीन संपादित करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सुरू करावी. भूसंपादन लवकर झाल्यास विमानतळाचे काम सुरू होईल, असे फडणवीस यांनी सांगितले. पुरंदर विमानतळाचे काम लवकर सुरू करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी आणि त्याठिकाणी मोठी विमाने उतरण्याची सोय असावी, यासाठी आतापासूनच आवश्यक ती काळजी घ्यावी. या विमानतळावर विमानांच्या हँगरचीही व्यवस्था असावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी केल्या.