मुंबई : दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसराच्या पुनर्विकासासाठी गुरुवारी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पमेंट एजन्सी (सी अँड डी) अर्थात खासगी विकासकांची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे आता रखडलेला हा पुनर्विकास लवकरच मार्गी लागणार आहे.
या पुनर्विकासाअंतर्गत कामाठीपुरा येथील ८००१ रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यानुसार निवासी रहिवाशांना ५०० चौ. फुटाचे घर तर अनिवासी रहिवाशांना २२५ चौ. फुटाचे गाळे दिले जाणार आहेत. त्याचवेळी ८०० जमीन मालकांनाही चांगला मोबदला दिला जाणार आहे.
अंदाजे ३४ एकर जागेवरील कामाठीपुऱ्यात ४७५ उपकरप्राप्त, १६३ उपकरप्राप्त नसलेल्या इमारती आणि १५ पुनर्बांधणी केलेल्या इमारतींसह ५२ कोसळलेल्या इमारती आणि इतर बांधकामे अशी एकूण ७३४ बांधकामे आहेत. कामाठीपुरातील इमारतींची दुरवस्था झाल्याने आता म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाच्या माध्यमातून या परिसराचा पुनर्विकास केला जात आहे. त्यानुसार आता खासगी विकसकाची नियुक्ती करत प्रत्यक्ष पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु केली आहे.
दरम्यान दुरुस्ती मंडळाने या प्रकल्पासाठीचा आराखडा यापूर्वीच तयार केला आहे. त्यानुसार रहिवाशांसाठी ५८ मजली १० पुनर्वसित इमारती प्रस्तावित आहेत. विक्रीसाठी थेट ७८ मजली अशा अंदाजे आठ इमारती प्रस्तावित आहेत. त्याचवेळी आराखड्यानुसार म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाला पुनर्विकासातून ४४ हजार चौ. मीटर इतके क्षेत्रफळ मिळणार आहे. या क्षेत्रावर अंदाजे ४५०० घरे निर्माण होण्याची शक्यता आहे. दुरुस्ती मंडळाने प्रकल्पाचा आराखडा तयार केला असला तरी आता सी अँड डी प्रारुपाने पुनर्विकास होणार असल्याने विकासकाची नियुक्ती झाल्यानंतर विकासकाकडून नव्याने आराखडा तयार केला जाणार आहे. मात्र विकासकाच्या आराखड्यात मोठे बदल होणार नसल्याची माहिती दुरुस्ती मंडळातील अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे कामाठीपुऱ्यात पुनर्विकासाअंतर्गत ५८ ते ७८ मजली इमारती उभ्या राहण्याची शक्यता आहे.
कामाठीपुरा पुनर्विकासाअंतर्गत ८००१ रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार आहे. तेथील निवासी रहिवाशांना ५०० चौ. फुटाचे घर तर अनिवासी रहिवाशांना २२५ चौ. फुटाचे गाळे दिले जाणार आहेत. दुसरीकडे जमीन मालकांनाही चांगला मोबदला दिला जाणार असून जमीन मालकांची संख्या ८०० अशी आहे.
दुरुस्ती मंडळाच्या निर्णयानुसार ५० चौ. मीटरपर्यंतची जागा असलेल्या मालकांना ५०० चौ फुटाचे एक घर दिले जाणार आहे. ५१ ते १०० चौ. मीटरची जागा असलेल्या मालकांना ५०० चौ. फुटांची दोन घरे, १०१ ते १५० चौ.मीटर जागा असलेल्यांना ५०० चौ.फुटांची तीन घरे याप्रमाणे मोबदला दिला जाणार आहे. एकूणच रहिवाशांचे, मालकांचे योग्य पुनर्वसन करण्यात येणार असल्याचा दावा यानिमित्ताने म्हाडाकडून करण्यात येत आहे.