मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला गुरांची धडक होऊन एक्स्प्रेसचे नुकसान झाले होते. अशा घटना टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने पोलादी कुंपणाचे काम हाती घेतले आहे. त्याप्रमाणे आता मध्य रेल्वेकडून कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जतदरम्यान पोलादी कुंपण उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत १० फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते शिर्डी आणि सीएसएमटी ते सोलापूर या वंदे भारत गाडय़ा सुरू झाल्या. या गाडय़ांचे गुरांच्या धडकेपासून संरक्षण करण्यासाठी कल्याण, कसारा आणि कर्जत विभागात टप्प्याटप्प्याने पोलादी कुंपण उभारण्यात येणार आहे. याबाबत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

उशिरा सुचलेले शहाणपण..

 मध्य रेल्वे प्रशासनाने वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यापूर्वीच आवश्यक सर्व उपाययोजना बाबी करणे अपेक्षित होते. गुरांचा वावर असलेल्या परिसरात संरक्षण भिंत, पोलादी कुंपण उभारणे अपेक्षित होते. टिटवाळा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलखाली म्हशी आल्या होत्या. या अपघाताची आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील अपघातांची मालिका लक्षात घेऊन उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र, आता मध्य रेल्वेला उशिरा सुचलेले शहाणपण आहे, असे प्रवाशांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई ते गांधीनगरदरम्यान पोलादी भिंत..

पश्चिम रेल्वेवर मुंबई ते गांधीनगरदरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. या गाडीला मोकाट गुरांनी धडक दिल्याच्या तीन ते चार घटना घडल्या आहेत. त्यातील काही घटनांत वंदे भारतच्या इंजिनाच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर पश्चिम रेल्वे प्रशासनाने गुरे येणाऱ्या भागात सुरक्षा भिंत, पोलादी कुंपण उभारण्याचे काम हाती घेतले. मुंबई ते गांधीनगर सुमारे ६२३ किमी लांबीचे पोलादी कुंपण बांधण्यात येणार असून त्यासाठी अंदाजे २४५.२६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनदेखील पोलादी कुंपण उभारणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.