मुंबई – स्वातंत्र्यदिनी कडक गणवेशातील विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध रांगा, झेंडावंदनासाठीचे संचलन हे सगळे चित्र यंदाही शाळांमध्ये स्वातंत्र्यदिनी दिसेल. पण, या चित्रातील अविभाज्य भाग असलेला शाळेच्या गणवेशाची अनुपस्थिती यंदा दिसणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणे अपेक्षित असलेला गणवेश अद्यापही सर्व शाळांपर्यंत पोहोचलेला नाही.

दरवर्षी शाळांच्या स्तरावर होणारी विद्यार्थ्यांच्या गणवेशाची खरेदी मोडीत काढून यंदा राज्याच्या पातळीवर एकच गणवेश लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. गणवेशाचे कापड पुरवठा करण्याचे कंत्राट पद्माचंद मिलापचंद जैन यांना देण्यात आले आहे. कंत्राटदाराने कापलेले कापड प्रत्येक गट शिक्षणाधिकारी कार्यालयास पुरवून त्यानंतर स्थानिक महिला बचत गटाद्वारे गणवेश तयार करून शाळेत पुरवठा करायचा आहे. गणवेश शिकवण्यासाठी १०० रुपये शिलाई निश्चित करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही बचत गटांकडून गणवेश शिवून शाळांपर्यंत पोहोचलेले नाहीत. राज्यातील अगदीच अपवादात्मक शाळा वगळता बहुतेक शाळांना गणवेश मिळालेला नाही. अनेक शाळांना कमी खर्चात गणवेश शिवून देणारे बचतगटही मिळालेले नाहीत. काही तालुक्यांमध्ये एकाच गटाला तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांचे गणवेश शिवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळेही अनेक ठिकाणी गणवेशाचे काम रखडले आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत गणवेश मिळाले नसल्याचे जळगाव, लातूर, पालघर, सोलापूर, नागपूर, हिंगोली, पुणे, नगर, नाशिक, रायगड या जिल्ह्यांतील शिक्षकांनी सांगितले.

हेही वाचा – रेल्वेच्या कारभाराने प्रवासी आणि कर्मचारीही त्रासले

पालकांना उत्तरे देताना शिक्षकांची दमणूक

गणवेशासाठी पालकांनी शिक्षकांकडे तगादा लावला आहे. सध्या काही शाळांमध्ये गेल्यावर्षीचा गणवेश घालून विद्यार्थी येत आहेत. मात्र, अनेकदा काही कुटुंबांमध्ये गणवेश हेच विद्यार्थ्यांचे वर्षभरातील नवे कपडे असतात. शाळा त्यांच्या स्वातंत्र्याचा लाभ घेऊन आतापर्यंत रंगिबेरंगी गणवेश निवडत आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही नव्या गणवेशाची उत्सुकता असते. यंदा मात्र विद्यार्थ्यांचा विरस झाला आहे.

हेही वाचा – अल्पसंख्याक आयोगाला नोकरी संदर्भातील आदेश देण्याचा अधिकार नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिळालेल्या गणवेशाच्या दर्जाबाबत नाराजी

काही शाळांमध्ये गणवेश मिळाले आहेत. मात्र, त्याचा मळखाऊ रंग, कापडाचा दर्जा याबाबत पालकांनी आणि शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गणवेशाच्या मापातही अनेक गोंधळ आहेत. त्यामुळे आलेले गणवेश विद्यार्थ्यांना बसण्यासाठी त्याची दुरुस्ती करावी लागणार आहे. काही ठिकाणी एकाच वर्गासाठी आलेल्या गणवेशांच्या रंगछटेत तफावत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.