‘एमएमआरडीए’च्या भूमिगत मार्ग प्रकल्पाला गती; जमीन संपादनाला सुरुवात

मुंबई : पूर्व उपनगरांतून पश्चिम उपनगरांमध्ये अवघ्या १५ ते २० मिनिटांत पोहोचता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने ठाणे-बोरिवलीदरम्यान भूमिगत मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला असून सल्लागाराच्या नियुक्तीनंतरही अनेक वर्षे हा प्रकल्प रखडला होता. मात्र आता या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी जमीन संपादनाला नुकतीच सुरुवात झाली आहे. ठाण्यातील सुमारे आठ हेक्टर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुरू करण्यात आली आहे.

आजघडीला रस्ते मार्गे ठाणे ते बोरिवली हे अंतर पार करण्यासाठी सव्वा ते अडीच तास इतका वेळ लागतो. वर्दळीच्या वेळी ठाण्याहून बोरिवलीला पोहोचण्यासाठी दोन तास लागतात. ही बाब लक्षात घेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) २०१५ मध्ये ठाणे ते बोरिवलीदरम्यान भूमिगत मार्ग प्रकल्प हाती घेतला. यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली. पण एमएसआरडीसीकडून हा प्रकल्प मार्गी लागला नाही. त्यामुळे हा प्रकल्प वर्षभरापूर्वी एमएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. प्रकल्प हस्तांतरित झाल्यानंतर तो मार्गी लावण्याच्या दृष्टीने एमएमआरडीएने पावले उचलली आहेत, तर आता ठाण्यातील आठ हेक्टर जागेचे संपादन करण्याची प्रक्रिया  सुरू झाली आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने मागील महिन्यांत यासंबंधीची एक नोटीस प्रसिद्ध करत जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे.

ठाण्यातील टिकुजीनी वाडी येथून हा रस्ता सुरू होणार आहे. त्यामुळे टिकुजीनी वाडी, चितळसर, मानपाडा, माजिवाडा परिसरातील आठ हेक्टर जागा संपादित करून ती एमएमआरडीएला हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्यानुसार सध्या टिकुजीनी वाडी येथील खासगी मालकीच्या अडीच हेक्टर जागेच्या संपादनाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ठाण्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) प्रशांत सूर्यवंशी यांनी दिली. उर्वरित जागा वन विभागाची असून ही जागा संपादित करण्याच्या प्रक्रियेलाही लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी ठाण्यासह अन्य ठिकाणची जमीन संपादित करावी लागणार आहे. एकूणच जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण करून मार्च-एप्रिल २०२२ मध्ये प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. काम सुरू झाल्यापासून पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असणार आहे.

प्रकल्पाची वैशिष्टय़े

  • ठाणे ते बोरिवली भूमिगत मार्ग
  • ११.८ किमीचा मार्ग
  • यात १०.२५ किमीचे दोन बोगदे
  • दोन्ही बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार
  • सहा मार्गिका (येण्यासाठी तीन-जाण्यासाठी तीन)
  • ११,२३५.४३ कोटी रुपये खर्च अपेक्षित
  • काम सुरू झाल्यापासून पाच वर्षांत काम पूर्ण करणार
  • हा मार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास केवळ १५ ते २० मिनिटांत बोरिवलीवरून ठाणे गाठता येणार.