विकास महाडिक

मुंबई: दिल्लीतील संसद भवनाची सुरक्षा भेदून दोन आंदोलक सभागृहापर्यंत पोहोचल्याने राज्यातील मंत्रालय व विधानभवन सुरक्षा यंत्रणा दक्ष झाली आहे. मंत्रालयात कामानिमित्ताने येणाऱ्या अभ्यागतांची संख्या कमी कशी होईल याची चाचपणी या निमित्ताने करण्यात आली. उद्यान प्रवेशद्वाराजवळ मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असल्याने केवळ निवेदन व अर्ज देण्यास आलेल्या अर्जदारांसाठी ध्वनीक्षेपकद्वारे मार्गदर्शन करण्याची सूचना देण्यात आली आहे. नवीन वर्षांच्या सुरुवातीस मंत्रालय व विधान भवनासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिशन (आरएफआयडम) प्रणाली तातडीने कार्यान्वित केली जाणार आहे.

मंत्रालयात यापूर्वी अनेक आंदोलकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. कोणी उडी मारू नये म्हणून दुसऱ्या मजल्यावर संरक्षक जाळी बसविण्यात आली आहे. जाळीवर उडय़ा मारून प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेण्याचे प्रयत्न आंदोलकांच्या वतीने केला जातो. सप्टेंबर महिन्यात विर्दभातील धरणग्रस्त व एका कंत्राटी शिक्षकाने केलेला आत्महत्येचा प्रयत्न लक्षवेधी ठरला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व मजल्यांवर पारदर्शक पोलादी जाळय़ा लावण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने गेली पंधरा दिवस मंत्रालयात गर्दी कमी होती. या काळात ही पारदर्शक जाळी बसविण्याचे जवळपास काम पूर्ण झाले आहे. मात्र सातव्या मजल्यावर थेट इमारतीचा छत असल्याने ही पारदर्शक जाळी बसवायची कशी असा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागाला पडला आहे. त्याच बरोबर सरकत्या जिन्याजवळ ही जाळी बसवावी लागणार असून ही दोन कामे अद्याप प्रलंबित आहेत. त्याबद्दल निर्णय झाला नसल्याचे समजते.

हेही वाचा >>>एटीएसच्या कारवाईत दोन बांगलादेशी नागरिक ताब्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्रालयात प्रवेशिका धारकांना प्रवेश करणे आता सुटसुटीत झाले आहेत. लवकरच मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांना रेडीओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिशन (आरएफआयडी) टॅग बसविले जाणार आहेत. त्यामुळे हा टॅग असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. मंत्रालय सुरक्षा नियमावलीतील पहिल्या टप्प्यातील कामे झाली असून दुसऱ्या टप्यातील कामे सुरू आहेत. आरएफआयडी कार्यप्रणाली ही दुसऱ्या टप्प्यात बसवली जाणार असून येत्या दोन महिन्यात ही प्रणाली कार्यान्वित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. – प्रशांत परदेशी, उपायुक्त, मंत्रालय सुरक्षा.