मार्चच्या अखेरीस ४३ अंश सेल्सिअस गाठणाऱ्या नागपूरच्या तापमानाने एप्रिलच्या पहिल्याच आठवडय़ात तापमानाचा हा पारा ओलांडला असून उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीपासूनच वाढलेल्या तापमानामुळे सकाळी दहा वाजतापासूनच उन्हामुळे जीव कासावीस व्हायला लागला आहे. तर दुपारी उन्हाचे चटके आणि झळांमुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. एप्रिलच्या पहिल्याच आठवडय़ात ही स्थिती आहे तर, संपूर्ण एप्रिल आणि मे आणि जूनमध्ये काय होणार, याची धास्ती नागरिकांनी घेतली आहे. उन्हाळयाची सुरुवात यावर्षी लवकरच झाली असे म्हणायला हरकत नाही. यंदाच्या तापमानाने मार्च महिन्यातच गेल्या दहा वर्षांतील उच्चांकी तापमानाचा विक्रम मोडला. गेल्या दहा वर्षांत नागपुरात मार्च महिन्यात पारा कधीही ४१ अंश सेल्सिअसच्या वर गेला नव्हता, पण यावर्षी हा विक्रम मोडला गेला आणि तापमानाचा पारा चक्क ४३ वर जाऊन पोहोचला. मार्च महिन्याच्या अखेरीस नागरिकांना उन्हाने चांगलेच हैराण केले. सकाळचे उन्हंही आता नकोसे वाटायला लागले असून सकाळी दहा वाजतापासूनच उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. दुपारच्या सुमारास रस्त्यावरची वर्दळ अचानक कमी झाली असून सकाळीसुद्धा घराबाहेर पडताना नागरिक संपूर्ण सुरक्षेसह बाहेर पडत आहेत. टोप्या, गॉगल, रुमाल आणि सोबतीला पाण्याची बॉटल असा सरंजाम जवळपास रस्त्यावरच्या प्रत्येकच नागरिकाकडे दिसून येत आहे. सायंकाळच्या सुमारास दिसून येणारी रसवंती, नारळपाणी, थंडपेयाची रस्त्यावरील दुकाने सकाळी दहापासूनच ग्राहकांच्या सेवेत सज्ज झालेली दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सारखी वाढ होत असून नागपूरचा उन्हाळा जाणवायला आता सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसात तो आणखी तीव्र होईल हे निश्चित आहे. एप्रिल महिन्यात बुधवारी शहरातील कमाल तापमानात ०.५ अंश सेल्सिअसने वाढ झाली तर किमान तापमान मात्र ०.१ अंश सेल्सिअसने कमी झाले. मार्च महिन्यात ४४ अंश सेल्सिअस पार करणाऱ्या अकोला शहरातील तापमान मात्र एप्रिलच्या पहिल्याच आठवडय़ात ४०.६ अंश सेल्सिअसवर आले आहे. चंद्रपूर शहरात सर्वाधिक ४३.२, वर्धा ४३, ब्रम्हपुरी ४२.२ तर यवतमाळ ४०.५ अंश सेल्सिअस तापमान होते.