भाजपकडून जोशी, तिवारी यांची नावे जाहीर; उपमहापौरपदही विभागून मिळण्याची शक्यता

पुढील सव्वादोन वर्षांत नागपूर शहराला दोन महापौर आणि दोन उपमहापौर मिळण्याची शक्यता आहे. प्रारंभीच्या काळात संदीप जोशी महापौर असतील तर शेवटच्या वर्षांत दयाशंकर तिवारींना ही जबाबदारी सोपवली जाईल. उपमहापौरपदी मनीषा कोठे असतील. या सर्व नावांची घोषणा भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी आज सोमवारी पत्रपरिषदेत केली.

महापौरपदासाठी अर्ज भरण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. आज भाजप, काँग्रेस आणि बसपने महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला. यासाठी २२ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाच्या नागपुरात पक्षातील हिंदी भाषकांमध्ये नाराजीचा सूर उमटल्याने स्पष्ट बहुमत असलेल्या नागपूर महापालिकेत सव्वा वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी दोन महापौरांची घोषणा करण्याची वेळ भाजपवर आली. १५१ सदस्यांच्या महापालिकेत १०८ सदस्य भाजपचे आहेत. महापालिकेचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२२ पर्यंत  आहे. पहिल्या अडीच वर्षांसाठी हे पद खुल्या प्रवर्गातील महिलेकडे होते. भाजपने नंदा जिचकार यांना संधी दिली. यंदा महापौरपद खुल्या प्रवर्गातील व्यक्तीसाठी आहे. भाजपमध्ये महापौरपदासाठी तीन दावेदार होते. ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांचे नाव सर्वात आघाडीवर होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तिवारी यांचे नाव अंतिम केल्याचे सांगण्यात येत होते. सत्ता पक्षनेते संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर होते. महापौरपदासाठी सोमवारी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यासाठी शहरातील आमदारांची बैठक बोलावण्यात आली. तोपर्यंतही  तिवारी यांचेच नाव अग्रक्रमांवर होते. परंतु माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणी महापौरपद  तिवारी आणि जोशी यांच्यात वाटून घेण्याची सूचना केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. जोशी यांनी विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात प्रचाराची सूत्रे सांभाळली होती. बहुमतात असलेल्या पक्षाने महापौरपदाच्या कार्यकाळाची विभागणी करून हिंदी

भाषकाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. याबाबत सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी पदाबाबत कोणत्याही प्रकारचा वाद नाही. हा केवळ खांदेपालट आहे. आम्ही सर्व मिळून विकासकामे करीत असतो, असा दावा केला.

पक्षनिहाय बलाबल

महापालिकेतील एकूण सदस्यसंख्या १५१ आहे. भाजपचे १०६ सदस्य आहेत. काँग्रेसचे २९ सदस्य आहेत. बसपचे १०, शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचा एक आणि अपक्ष एक नगरसेवक आहे. भाजपचे एकूण १०८ सदस्य होते. त्यापैकी दुर्गा हत्तीठेले या अपात्र ठरल्या तर एका नगरसेकाचा मृत्यू झाल्याने तेथे पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, बसपही मैदानात

महापौर आणि उपमहापौरपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी, बसपच्या उमेदवारानेही अर्ज भरला आहे. भाजपला स्पष्ट बहुमत असताना देखील बिनविरोध निवडणूक होण्याची चिन्हे नाहीत. काँग्रेसने महापौरपदासाठी हर्षला साबळे आणि उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचे दुनेश्वर पेठे यांनी अर्ज केला आहे. बहुजन समाज पार्टीतर्फे महापौरपदासाठी इब्राहीम खान पठाण, उपमहापौरपदासाठी मंगला लांजेवार यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. शिवसेनेने मात्र कोणतीची भूमिका घेतलेली नाही.

सत्तापक्ष नेतेपदी संदीप जाधव

भाजपने महायुतीतील शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिला. मात्र महापालिकेत स्पष्ट बहुमत असताना देखील हिंदी भाषकांची नाराजी दूर करण्यासाठी अडीच वर्षांपेक्षा कमी कालावधीत दोन महापौर करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमहापौरपद देखील दोन केले जाणार आहेत. पहिल्यांदा  मनीषा कोठे यांना  संधी देण्यात आली आहे. पुढील नावाची घोषणा नंतर केली जाणार आहे. तसेच जातीय समतोल साधण्यासाठी सत्तापक्ष नेतेपदी संदीप जाधव यांची निवड करण्यात आली आहे. संदीप जोशी हे महौपार झाल्यानंतर सत्तापक्ष नेतेपद रिक्त होणार आहे.