नागपूर : नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात बोगस शालार्थ आयडी तयार करुन शिक्षक भरती करण्यात आल्याचे शेकडो प्रकरणे समोर आली आहेत. यात केवळ नागपूर जिल्ह्यातील बोगस शिक्षक भरतीची विषेश पथकाकडून चौकशी करण्यात येत आहे. शालार्थ आयडीनंतर आता बनावट कागदपत्रे तयार करुन बोगस तुकडीला मान्यता देवून तेथे शिक्षक भरती करण्यात आलाचा प्रकार समोर आला आहे, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला. याला आधार म्हणून त्यांनी माहिती अधिकारात प्राप्त कागदपत्रे सादर केली.

शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या मतदारसंघ मालेगाव येथे हा प्रकार झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील शाळेचा १८ फेब्रुवारी २०१४ ला आदेश काढून जून २०१२ पासून विनाअनुदान तत्वावर नवीन तुकडयांची मान्यता देण्यात आली होती. तसा आदेशही शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढला होता. या संदर्भात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला माहितीच्या अधिकारात तपशील मागितला असता मालेगाव जि. नाशिक येथील शाळेंना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शासन शुध्दीपत्रका नुसार नवीन तुकडयांना मान्यता देण्यात आल्याचा आदेश देण्यात आला. हा आदेश बनावट असल्याची बाब समोर आली. 

२८ ऑगष्ट २०१५ च्या शासन निर्णयानुसार नवीन तुकडयांना मान्यता देता येत नाही. यामुळेच जुन्या तारखेचा बनावट आदेश काढून मालेगाव जि. नाशिक येथील १७  शाळांना नवीन तुकडयांची मान्यता देण्यात आली. याच मान्यतेच्या आधारावर नंतर या तुकडयांना अनुदान सुध्दा देण्यात आले आहे. या नवीन तुकडयांना मान्यता देवून जवळपास १०० पेक्षा जास्त शिक्षकांची बोगस भरती सुध्दा करण्यात आल्याचा दावा  देशमुख यांनी केला आहे. सध्या नागपूर जिल्ह्यात ज्या पध्दतीने बोगस शिक्षक भरती घोटाळा करण्यात आला, त्याच पध्दतीने हा मालेगाव जि. नाशिक येथे सुध्दा करण्यात आला असून या घोटाळयाची व्याप्ती ही संपूर्ण राज्यातच असल्याच्या अनेक तक्रारी आता समोर येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूर जिल्ह्यातील घोटाळयांची चौकशी ही एसआयटीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. परंतु संपूर्ण राज्यात हा घोटाळा असल्यामुळे या शिक्षक भरती घोटाळयांची चौकशी सेवानिवृत न्यायाधीशाच्या मार्फत करण्यात यावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी पत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.