यवतमाळ : वर्षभरापूर्वीच्या खून प्रकरणाचा सूड घेण्यासाठी भरदिवसा एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी साडेतीनच्या सुमारास यवतमाळच्या चांदणी चौक परिसरातील वनविभाग कार्यालयाजवळ घडली.

मृत तरुणाचे नाव मनीष सागर शेंद्रे (२८, रा. रमाई पार्क, यवतमाळ) असे असून, जानेवारी २०२४ मध्ये कळंब चौकात अयुब नामक तरुणाच्या हत्येप्रकरणी तो कारागृहात होता. पंधरा दिवसांपूर्वीच त्याची जामिनावर सुटका झाली होती. तेव्हापासून त्याच्यावर पाळत ठेवली जात होती.

मंगळवारी दुरुस्तीला दिलेली दुचाकी घेण्यासाठी आलेल्या मनीषवर चार ते पाच मारेकऱ्यांनी अचानक हल्ला चढवला. त्यांनी चाकू आणि कोयत्याने त्याच्या मानेवर, हातावर व गळ्यावर सपासप वार केले. जखमी अवस्थेत मनीषने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र मारेकऱ्यांनी पाठलाग करत त्याला जागीच ठार केले. हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, एलसीबी प्रमुख सतीश चावरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर, शहर ठाण्याचे प्रभारी जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत अमानुषपणे मनीषवर वार करण्यात आले. मनीषच्या संतप्त नातेवाईकांनी एलआयसी चौकात वाहतूक रोखून धरली, त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, या हत्याप्रकरणी मोहसीन खान अय्यूब खान, साहील खान, दानिश उर्फ सबा अहमद, सोहेल खान युसुफ खान, अलिम, शेख कासीव शेख फरीद, मुन्ना गॅरेजवाला (सर्व रा. तायडेनगर, पांढरकवडा रोड, यवतमाळ) यांना पोलिसांनी कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून गुन्हेगारी टोळ्यांवर विशेष लक्ष ठेवून आहे.

छेडखाणीतून सुरू झालेला वाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्षभरापूर्वी मनीष आपल्या प्रेयसीसह कळंब चौकातून जात असताना तिची छेड काढण्यात आली होती. या घटनेनंतर झालेल्या वादातून मनीषने बंदुकीने गोळी झाडून अयुब या तरुणाचा खून केला होता. याच प्रकरणात तो कारागृहात होता. सुटकेनंतर सूड घेण्यासाठी अयुबच्या मित्रांनी संगनमताने मनीषला ठार मारले. या घटनेत छेडखानीपासून सुरू झालेला संघर्ष दोघांच्या हत्येपर्यंत पोहोचला आहे. भरदिवसा, रहदारीच्या ठिकाणी घडलेल्या या हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, ‘खुनाचा बदला खून’ ही यवतमाळच्या गुन्हेगारीची पद्धत आहे. हे सूत्र या घटनेतही वापरण्यात आले. यवतमाळातील गुंडांच्या काही टोळ्या या पद्धतीने नामशेष झाल्या आहेत.