लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मोठ्या पीछेहाटीचा सामना करावा लागला. २०१९ च्या निवडणुकांमध्ये भाजपाच्या २३ जागा निवडून आल्या होत्या. यंदा त्या जागा ८ पर्यंत खाली आल्या आहेत. त्याशिवाय महयुतीलाही जागांचा फटका बसला असून तिन्ही पक्षांच्या मिळून अवघ्या १७ जागा जिंकून आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी महायुतीकडून सावध पावलं टाकली जात आहेत. पण असं असताना अद्याप तिन्ही पक्षांमध्ये जागावाटप कसं असेल? याबाबत घोषणा झालेली नसताना अजित पवार गटाकडून विदर्भातील जागांबाबत मोठं विधान करण्यात आलं आहे.

विधानसभेच्या २८८ जागांसाठी अवघ्या तीन महिन्यांत, अर्थात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने महाराष्ट्रातील दोन प्रमुख आघाड्या, अर्थात एकीकडे भाजपा-शिंदे गट-अजित पवार गटाची महायुती तर दुसरीकडे ठाकरे गट-शरद पवार गट-काँग्रेसची महाविकास आघाडी यांनी मित्रपक्षांसोबतच निवडणुका लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दोन आघाड्यांमधील ही थेट लढत पाहायला मिळणार आहे. त्यानुसार दोन्ही बाजूला जागावाटप, इच्छुक उमेदवार, संभाव्य उमेदवार, विजयाची शक्यता वगैरे चर्चा सुरू झाल्या आहेत. पण त्यातच, अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

राज्यातील २८८ जागांवर सर्व्हे?

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं राज्यातील सर्व २८८ जागांवर सर्व्हे सुरू केल्याचं धर्मराव अत्राम यांनी टीव्ही ९ शी बोलताना सांगितलं. “राष्ट्रवादी काँग्रेसचं निवडणुकीच्या दृष्टीने काम सुरू झालं आहे. २८८ जागांवर आमचा सर्व्हे चालू आहे. त्या दृष्टीने आम्ही चर्चा करायलाही बसलो होतो. आम्ही विदर्भातल्या ६० ते ६५ जागांपैकी १५ ते २० जागा लढवायला हव्यात, असं प्रफुल्ल पटेल यांचं मत आहे”, असं सूचक विधान धर्मराव अत्राम यांनी केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी जागावाटपाच्या चर्चेत अजित पवार गट या १५ ते २० जागांसाठी आग्रही असण्याची शक्यता आहे.

भाजपाची अजित पवारांबाबत नेमकी भूमिका काय? ‘विवेक’मधील लेखानंतर मुनगंटीवारांचं स्पष्टीकरण, हिंदी डायलॉग मारून म्हणाले…

“प्रफुल्ल पटेल यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही विदर्भातल्या अशा १५ ते २० जागा तपासत आहोत जिथे आम्हाला १०० टक्के यश मिळेल”, असंही धर्मराव अत्राम यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ संदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना स्पष्ट केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनिल देशमुखांविरोधात सक्षम उमेदवार देणार!

दरम्यान, नागपूरमध्ये अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मोठे नेते व प्रबळ उमेदवार मानले जातात. त्यांना आव्हान देण्याची तयारी शरद पवार गटानं केल्याचं अत्राम यांनी नमूद केलं. “अनिल देशमुखांविरोधात आम्ही उमेदवार देणार आहोत. आमच्याकडे त्यांच्यापेक्षा मोठा त्यांच्याचकडचा एक उमेदवार आहे. त्यांच्या कुटुंबातला, त्यांच्या नातेवाईकांमधला सक्षम उमेदवार आमच्याकडे आहे”, असं सूचक विधान धर्मराव अत्राम यांनी केलं. त्यामुळे विदर्भात यंदाच्या विधानसभा निवडणूक संग्रामात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये थेट लढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.