scorecardresearch

चंद्रपूर : “मोदी सरकारमुळे सर्वसामान्यांचा पैसा धोक्यात”; काँग्रेसचे आंदोलन

गुंतवणुकीसंदर्भात संसदेत चर्चा व्हावी व गुंतवणुकदारांच्या पैशाला संरक्षण मिळावे यासाठी सरकारने योग्य तो निर्णय घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

चंद्रपूर : “मोदी सरकारमुळे सर्वसामान्यांचा पैसा धोक्यात”; काँग्रेसचे आंदोलन
मोदी सरकारविरोधात चंद्रपुरात कॉंग्रेसचे आंदोलन

‘एलआयसी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या संस्थांमध्ये देशातील सर्वसामान्य, मध्यमवर्ग, नोकरदार, छोटे व्यापारी यांनी आपल्या मेहनतीचा पैसा गुंतवला आहे. परंतु, केंद्रातील मोदी सरकारने अदानींच्या कंपन्यांमध्ये हा पैसा जबरदस्तीने गुंतवला आहे. अदानी समूहातील गैरकारभारामुळे गुंतवणूक केलेले कोट्यवधी रुपये परत मिळतील का, अशी भीती निर्माण झाली आहे. मोदी सरकारमुळेच सर्वसामान्यांचा पैसा धोक्यात आला असल्याचा आरोप चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस सिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केला.

हेही वाचा- अमरावती : अदानी, मोदी सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक; स्टेट बँकेसमोर निदर्शने

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या निर्देशानुसार सोमवारी (ता. ६) देशभर आंदोलन करण्यात येत आहे. प्रदेश काँग्रेस समितीच्या निर्देशानुसार चंद्रपूर शहर जिल्हा व ग्रामीण काँग्रेसच्या वतीने शहरातील कस्तुरबा मार्गावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर तसेच पडोली येथे रितेश तिवारी व ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा- शिंदे गटाशी युतीचा विदर्भात भाजपला काहीच फायदा झाला नाही

अदानी समूहातील आर्थिक गैरकारभार पुढे आणणाऱ्या अहवालाची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी व्हावी अथवा सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करावी, एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर सरकारी वित्तीय संस्थांमधील अदानी समूहात केलेल्या मोठ्या गुंतवणुकीसंदर्भात संसदेत चर्चा व्हावी व गुंतवणुकदारांच्या पैशाला संरक्षण मिळावे यासाठी सरकारने योग्य तो निर्णय घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 15:27 IST