चंद्रपूर : दुर्गापूर खुल्या विस्तारित खाणीमुळे ताडोबाचे जंगल व वाघाचा भ्रमणमार्ग धोक्यात आला आहे. या खुल्या खाणीमुळे ३०० एकर घनदाट जंगल उद्ध्वस्त होणार आहे. खाणीसाठी १३ हजार ४५७ मोठे वृक्ष आणि ६४ हजार ३४९ बांबू वृक्ष तोडल्या जाणार आहेत. यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढला आहे. यामुळे खुल्या कोळसा खाण विस्तारीकरणाला तीव्र विरोध केला जात असून जंगल, वाघ वाचवण्यासाठी पर्यावरणवादी एकत्र आले आहेत. दाट जंगल कोळसा खाणींच्या घशात टाकू नका, अशी मागणी पर्यावरणवाद्यांनी राज्य व केंद्र सरकारला केली आहे.

राज्य आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या खाणीला मंजुरी दिली आहे. ही खाण १३ वर्षांपूर्वी येऊ घातलेल्या अदानी कोळसा ब्लॉकला लागून, सिनाळा गावाजवळ असल्यामुळे आणि या खाणीच्या परिसरात किमान आठ ते दहा वाघ आणि असंख्य वन्यजीव असल्याने चंद्रपूर परिसरात पर्यावरण आपत्ती निर्माण होण्याचीच चिन्हे आहे. ही खाण शहराला लागूनच असल्यामुळे आधीच प्रदूषित असलेल्या शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

हेही वाचा >>> भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावलले जात असल्याच्या टिकेला बावनकुळेंचे राष्ट्रवादीला प्रत्युत्तर, म्हणाले…

ही खाण सुरू झाल्यास शेतकरी, आदिवासी जंगलात मारले जातील, अशी भीती पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे. कोळशासाठी जंगल, वाघ, वन्यजीव आणि ताडोबाचे जंगल देणे योग्य नाही. या खाणीमुळे ताडोबाचे जंगल आणि वाघाचा भ्रमणमार्ग धोक्यात येत असल्यामुळे या खाणीला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रत्यक्ष कोळसा खाण परिसरात जाऊन विरोध दर्शवण्याचा उपक्रम ‘ताडोबा बचाव समिती’ने राबवला होता. या खुल्या कोळसा खाणीला, वनविभाग, राज्य शासन, केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, वाइल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण, अशा अनेक महत्त्वाच्या संघटनांनी परवानगी दिली असली तरी ‘वन्यजीव आणि वाघ वाचावा’ यासाठी न्यायालय तसेच राष्ट्रीय हरित आयोगात धाव घेतली जाईल आणि वाघांचे घर वाचवले जाईल, अशी भूमिका समितीने घेतली आहे.

हेही वाचा >>> नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून विधवा महिलेवर बलात्कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवारी सकाळी पर्यावरणवाद्यांनी केलेल्या आंदोलनात बंडू धोत्रे, प्रा. सुरेश चोपणे, डॉ. योगेश दूधपचारे, दीपक दीक्षित, अनिल राईकवाल, ॲड. मलक शाकिर, किशोर जामदार, नितीन रामटेके, शेख वाजिद, विजय साळवे, डॉ. आशीष महातळे, जयेश बेले, अतुल वासुदेव, मनीष गावंडे, भूषण ढवळे, अरुण सहाय, मनोज पोतराजे, भूषण फुसे, संजय जावडे, राजू काहीलकर, सुनील लिपटे, सुमित कोहळे, जयेश बैनालवार, बंडू दुधे, अनिल ठाकरे सहभागी झाले होते.