लोकसत्ता टीम

वर्धा : सध्या परभणी येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या वर्धेच्या तत्कालीन भूसंपादन अधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी २ कोटी ६४ लाख रुपयाचा अपहार केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हे दाखल झाले आहे.

त्या १७ फेब्रुवारी २०२२ रोजी रुजू झाल्यानंतर १२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत लघु सिंचन कालवे प्रकल्पच्या उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. शासकीय प्रकल्पासाठी जमिनीचे अधिग्रहण करण्यास मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्या जात असतो. त्याची जबाबदारी संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांची असते. त्या पदावर असणाऱ्या स्वाती सूर्यवंशी यांनी शासकीय निधीचा अपहार केल्याची माहिती वर्धा जिल्हाधिकाऱ्यांना मिळाली. लगेच त्यांनी या कार्यालयातील कागदपत्रे सील केली. समिती स्थापन करून चौकशी सूरू केली. त्यात समुद्रपूर तालुक्यातील २५ वर्षांपूर्वी वाटप झालेल्या १६ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रकरण पुढे आले. त्यांच्या नावे २ कोटी १३ लाख ३११ रुपये बनावट कागदपत्रे सादर करीत काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले. तर कोषागार कार्यालयातील शासकीय खात्यातून ५ लोकांच्या नावे ५० लाख ८५ हजार ४२४ रुपये दोन पतसंस्थेत खोटे खाते उघडून वळते केल्याचे दिसून आले.

आणखी वाचा-नागपुरातील रामझुल्यावर भीषण अपघात, महिला कारचालकाने दोन युवकांना चिरडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौकशीत अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या.२५ वर्षांपूर्वी निवड झालेल्या शेतकऱ्यांचे नाव निवाड्यात नव्हते. मोबदला मिळावा म्हणून ज्यांनी अर्ज सुद्धा सादर केला नाही, अश्याही लोकांच्या नावाने पैसे उकलण्यात आले. या प्रकरणात शेतकरी महिला नागरी सहकारी पतसंस्था व हिंगणघाट येथील आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था यांच्याशी सूर्यवंशी सांगनमत करीत बनावटी कागदपत्रे देत खोटे खाते काढले. त्यात पैसे जमा करीत नंतर ते काढण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. हे प्रकरण महसूल खात्यात चांगलेच खळबळ उडविणारे ठरत आहे. उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यावर पूर्वी काही प्रकरणात पण कारवाई झाली असल्याची बाब आता पुढे आली आहे. हा मोठा भ्रष्टाचार असल्याचे सिद्ध झाल्यावर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी पोलीस तक्रार दाखल केली. शहर पोलिसांनी विविध कलमन्वये गुन्हे दाखल केले आहे. पोलीस पुढील कारवाई काय करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.