नागपूर : हवामान खात्याने एकीकडे राज्यात पावसाला ‘ब्रेक’ लागणार असे सांगितले असले तरीही दुसरीकडे विदर्भात मात्र सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामानात झालेला बदल त्यासाठी कारणीभूत असून राज्यात अशी बेभरवश्याची स्थिती निर्माण झाली आहे. राजस्थान परिसरात निर्माण झालेल्या ‘सायक्लोनिक सर्क्युलेशन’मुळे आणि उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील चार दिवस पावसात चढ-उतार पाहायला मिळणार आहेत. केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात देखील मुंबई, पुण्यात मोसमी पावसाची घोषणा करण्यात आली.

दरम्यान, हा वादळी पाऊस असल्याने आणि हवामान खात्याने मोसमी पावसाची घोषणा केल्यानं हवामान शास्त्रज्ञांनी त्यावर आश्चर्य देखील व्यक्त केले. हा पाऊस मोसमी की पूर्व मोसमी हा वाद कायम असतानाच मुंबई, पुण्यानंतर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी मोसमी पावसाची घोषणा करण्यात आली. मात्र, याठिकाणी आलेला पाऊस देखील वादळीच होता. दरम्यान, हवामान खात्यानेच राज्यातील पावसाला ‘ब्रेक’ लागणार असे सांगितले असले तरीही अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या ११ जिल्ह्यांसाठी मात्र सतर्कतेचा इशारा दिला आहे. या भागांमध्ये पुढील तीन ते चार दिवस विजांचा कडकडाट, वादळी वारे (५० किलोमीटर प्रतितास) आणि मुसळधार पावसाचा जोर कायम राहील, असेही हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अलीकडेच बीड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे वडवणी तालुक्यातील १५ गावांचा संपर्क तुटला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमरावती आणि धाराशिव जिल्ह्यांत अर्ध्या तासात इतका पाऊस झाला की रस्ते पाण्याखाली गेले. तर नागपूर येथेही सलग दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. यात एक युवक वाहून गेला. तर यवतमाळ, बुलढाणा येथेही पुरात वाहून गेल्याने माणसे मृत्युमुखी पडली. दरम्यान, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलमध्ये मात्र पावसाचा जोर ओसरला आहे. याठिकाणी अधूनमधून हलक्या सरी कोसळत आहेत. मोसमी पावसाची घोषणा हवामान खात्याने केली असली तरीही हा पाऊस मोसमी की पूर्वमोसमी हा तिढा अजूनही सुटलेला नाही. कोकणात मात्र जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर आता काही भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आजपासून राज्यात हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मात्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.