अकोला : पश्चिम व दक्षिण भारताला जोडणाऱ्या रेल्वे गाडीला मध्य रेल्वेने मुदतवाढ दिली. त्यामुळे गर्दीच्या काळात प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, रेल्वेचे डिजिटल व्यवहार वाढले आहेत. ९४.७६ टक्के उत्पन्न रेल्वेला डिजिटल माध्यमातून प्राप्त झाले.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन गाडी क्रमांक ०७०६२/०७०६१ भावनगर-हैदराबाद (साप्ताहिक) समर स्पेशल गाडीचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या डब्यांची रचना, वेळापत्रक, थांबे आणि मार्गामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
गाडी क्रमांक ०७०६२ भावनगर-हैदराबाद साप्ताहिक समर स्पेशल गाडी आता २९ जूनपर्यंत चालवण्यात येईल. गाडी क्रमांक ०७०६१ हैदराबाद-भावनगर साप्ताहिक समर स्पेशल गाडी आता २७ जूनपर्यंत चालवण्यात येणार आहे. या गाडीला सिहोर, सोनगढ, धोला, बोटाद, सुरेंद्रनगर गेट, विरमगाम, साबरमती, वडोदरा, सुरत, उधना, नंदुरबार, अमळनेर, धरनगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशीम, हिंगोली, बसमत, पूर्णा जंक्शन, नांदेड, मुदखेड जंक्शन, बासर, निजामाबाद, कामारेड्डी, मेडचल आणि सिकंदराबाद येथे थांबा आहे.
भुसावळ विभागात पार्सल सेवा डिजिटलदृष्ट्या सक्षम
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने चालू आर्थिक वर्षात डिजिटल व्यवहारांच्या क्षेत्रात प्रगती साधली. पार्सल सेवेमध्ये डिजिटल व्यवहारांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांच्या एकत्रित आकडेवारीनुसार, विभागाने ९४.७६ टक्के रक्कम ही डिजिटल प्रणालीद्वारे जमा केली. या डिजिटल महसूल संकलनात ‘पॉईंट ऑफ सेल’ यंत्राद्वारे सर्वाधिक ६९ टक्के रक्कम गोळा केली. डिमांड ड्राफ्ट, व्हाउचरच्या माध्यमातून १८ टक्के आणि क्यूआर कोडच्या मार्फत आठ टक्के रक्कम प्राप्त झाली. भारतीय रेल्वेच्या ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘कॅशलेस इकॉनॉमी’ या दूरदृष्टीच्या उद्दिष्टांना साध्य करण्याचे भुसावळ विभागाचे प्रयत्न आहेत.
विभागामार्फत पार्सल व्यवहारांमध्ये डिजिटल पेमेंट सुलभ करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व्यवहार अधिक पारदर्शक, सुरक्षित व जलद करण्यात आले. प्रवाशांना आणि व्यावसायिक ग्राहकांना डिजिटल माध्यमांची माहिती देणे, कर्मचारी प्रशिक्षण, तसेच कॅशलेस व्यवहारासाठी प्रोत्साहन देणाऱ्या मोहीम राबविल्या जातात. भविष्यातही भुसावळ विभाग डिजिटल व्यवहारांमध्ये अधिक वाढ करण्यासाठी प्रयत्न करणार असून नागरिकांना उत्तम सेवा दिल्या जातील, असे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.