नागपूर : उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत गद्दारी केली नसती तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही सोबतच घेतले नसते. मात्र राज्यात आता महायुती असल्यामुळे आगामी निवडणुकीत महायुती म्हणून निवडणूक लढणार असून राज्यातील ४८ पैकी ४५ पेक्षा अधिक जागेवर विजयी होऊ, असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने तावडे नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजप युतीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले होते मात्र उद्धव ठाकरे यांनी आमच्या सोबत गद्दारी केल्यामुळे एकनाथ शिंदे त्यातून बाहेर पडले. शिंदे फडणवीस सरकार राज्यात असतानाच अजित पवार आमच्यासोबत आले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली नसती तर आज अजित पवार यांना सोबत घेतले नसते. महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप सामूहिक नेतृत्वात निवडणूक लढणार असून या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णयही सामूहिकरित्या घेण्यात येईल. भाजपने २०१४ नंतर राजकारणाची दिशा बदलविली असून येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे लक्ष्य लोकसभेच्या चारशे जागांचे आहे.

हेही वाचा : वंचितची मदत घेण्यात काँग्रेसला कमीपणा वाटतो का? “अहंकार बाजूला ठेवा, अन्यथा…”, वंचितचे प्रवक्ता डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांचा थेट इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंडिया आघाडी तयार झाली. मात्र काँग्रेसच्या हेकेखोर भूमिकेमुळे त्यांच्यामध्ये फूट पडली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत आघाडीतील सहकारी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याच्या मानसिकतेत आहेत. आघाडीमुळे तसेही भाजपला काही नुकसान नव्हते. मोदी यांच्यावर जनतेच्या विश्वासामुळे भाजपला यश मिळेल. दाक्षिणात्य राज्यावर आम्ही जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये भाजपच्या जागा वाढतील. तामिळनाडूमध्ये युती झाली तर त्या ठिकाणी आम्हाला यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.