नागपूर : आयुष्यातील प्रत्येक क्षण ज्यांनी फक्त आणि फक्त जंगल आणि त्यातील सजीवांसाठी घालवला, त्या अरण्यऋषीने वयाच्या ९३व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. मात्र, निसर्गाच्या कणाकणात अजूनही तो श्वास जिवंत आहे. मृत्यूनंतर त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या अस्थी त्यांच्या गुरूंच्या म्हणजेच अरण्यपुत्र माधवराव पाटील डोंगरावर यांच्या समाधीशेजारी पुरण्यात येणार आहे. हे कळल्यापासून त्यांच्यावर जीवापाड आणि निस्वार्थपणे प्रेम करणारा आदिवासी त्यांच्या अस्थीदर्शनाकडे डोळे लावून बसला आहे.
पद्मश्री अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी वनखात्यात असताना सर्वाधिक वेळ नवेगावबांध येथे घालवला. अगदी सेवानिवृत्तीनंतरही ते बराच काळ येथे राहिलेत. त्यामुळे या परिसरातील आदिवासी आणि गावकऱ्यांशी त्यांचे घट्ट नाते विणले गेले. वनखात्याचा अधिकारी म्हणून त्यांनी कधीच बडेजाव मिरवला नाही. याउलट आदिवासींकडून जेवढे ज्ञान मिळवता येईल, ते मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याकाळात आदिवासी जंगलातील प्राण्यांची, पाखरांची शिकार करत. मारुती चितमपल्लीच्या हे लक्षात आले. त्यांनी अतिशय संयमाने परिस्थिती हाताळत आदिवासींच्या हातातील बंदुका काढून घेतल्या. पण त्यांनी आदिवासींवर गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे आदिवासींसाठी ते त्यांचे दैवत बनले. तेव्हापासूनच आदिवासी त्यांना ‘पाखरू साहेब’ या नावाने हाक मारत.
आदिवासींच्या पारंपरिक ज्ञानाचा उपयोग त्यांनी जंगल, वन्यजीव समृद्धीसाठी केला. एकीकडे राज्यातून ‘सारस’ पक्षी नामशेष होत असताना चितमपल्ली यांनी त्यांच्या संवर्धनासाठी पावले उचलली आणि राज्यात फक्त याच जिल्ह्यात ‘सारस’ पक्षी जिवंत आहे. उंदीर चोरी करतात, माकडे शेकोटी पेटवतात या ज्या गोष्टींचा उल्लेख त्यांच्या पुस्तकात आहेत, त्या आदिवासींच्या ज्ञानातूनच आल्या आहेत. ते स्वतः हे नम्रपणे मान्य करतात. असे हे आदिवासींचे ‘पाखरू साहेब’ नवेगावबांध सोडून गेले, तेव्हा सर्वात जास्त दुःख कुणाला झाले असेल तर ते इथल्या आदिवासीला. नंतर त्यांना त्यांच्या ‘पाखरू साहेबां’ना भेटता आले नाही आणि त्यांच्या मृत्यूची वार्ता कळल्यानंतर सर्वात जास्त दुःखी झाला तो नवेगावबांधचा आदिवासी.
आता ‘पाखरू साहेब’ कधीच दिसणार नाही, पण त्यांच्या अस्थी त्यांच्याच गावात पुरण्यात येणार हे कळल्यापासून ‘पाखरू साहेबां’च्या अस्थी दर्शनासाठी आदिवासी आसुसलेला आहे. पहिल्याच दिवशी २००च्या संख्येने आदिवासी बांधव माधवराव पाटलांच्या समाधी स्थळावर जाणाऱ्या रस्त्यावर जमा झाला होता. आणि आताही ते त्याच वाटेला डोळे लावून आहेत.