नागपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अन्नत्याग आंदोलन करणारे माजी मंत्री बच्चू कडू यांना सर्वच विरोधी पक्षाने पाठिंबा दिला होता. परंतु कडू यापूर्वी शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्यासोबत होते. त्यावर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी कडू आमचे जुने सहकारी आहेत. त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहेे, असे नागपुरात वक्तव्य केले होते.
बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले. त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिल्याचे तसेच सरकारने बच्चू कडू यांना लेखी आश्वासन दिल्याचेही सांगण्यात येत आहे. बच्चू कडू यांनी मात्र तूर्तास आंदोलनाला स्थगित देत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर मागणी मान्य झाल्यास येत्या २ ऑक्टोबरला आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी गुरूकूंज मोझरी येथे उपोषणस्थळी पोहचून बच्चू कडू यांची भेट घेतली होती त्यांनी यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागण्यांच्या पूर्ततेसंदर्भातील पत्र वाचून दाखवले होते.
उदय सामंत यांनी बच्चू कडू यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर बच्चू कडू यांनी हे आदोलन तूर्त स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. आता बच्चू कडू यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावर अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यावर बच्चू कडू यांना हा माझा गेम करण्याचा प्रयत्न आहे. मी आंदोलन केले हे त्याचे परिणाम आहे, असे म्हटले आहे. मात्र, गेल्या शनिवारी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते भास्कर जाधव यांनी यासंदर्भात भाष्य केले होते. मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले होते. तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मनोज जरांगे यांना आश्वासन दिले.
सरकारने ते आश्वासन पूर्ण केले नाही. मनोज जरांगे पाटीलांचे काय झाले. हे सरकार बच्चू कडूंना दिलेले आश्वासन पूर्ण करेल, यावर आजतरी विश्वास ठेवणे कठीण आहे. भाजप प्रणित सरकार बच्चू कडूंची स्थिती जरांगे पाटील यांच्या सारखी करणार नाही, याची कोणीही शाश्वती देऊ शकते नाही, असे जाधव म्हणाले होते. जरांगे पाटील यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता बच्चू कडूंना जुन्या प्रकरणाचा हवाला देत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदावरून अपात्र ठरवण्यात आले आहे. कडू यांनी ही कारवाई सुड बुद्धीने करण्यात आल्याचे म्हटले आहे.