नागपूर: लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून भाजप संविधान बदलणार असल्याचा प्रचार करण्यात आला. यामुळे निवडणुकीत भाजपला चांगलाच फटकाही बसल्याचे दिसून आले. त्याचा धसका भाजपने अजूनही घेतलेला आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपने नवीन रणनीती आखलेली आहे. घरोघरी जाऊन आणीबाणीच्या दिवशी भाजप संविधानाची प्रत वाटणार आहे. तसेच संविधानाचे खरे मारेकरी काँग्रेसच आहेत हे पटवून देणार आहे.

यासोबतच केंद्र सरकारला ११ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त भाजपतर्फे अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २०१४ ते २०२५ या ११ वर्षात देशाचा कसा कायापालट झाला, हे या उपक्रमांद्वारे सांगितले जाणार आहे. या उपक्रमाचा समारोप २५ जून रोजी आणीबाणीदिनी होणार आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.

तिवारी म्हणाले, नागपूर शहरांत सहा विधानसभा क्षेत्रातील २० मंडळात प्रत्येकी १० सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या सभांमधून ११ वर्षातील निर्णयांची माहिती दिली जाईल. याशिवाय व्यापारी, शिक्षक, वकील, सी. ए. अशा विविध समाज घटकांशीही संवाद साधण्यात येईल. विशेषत: ३५ वर्षांपेक्षा कमी वयातील तरुण तसेच नवउद्यमींशी संवाद साधून सरकारविषयीच्या त्यांच्या भावना आणि मते जाणून घेण्यात येणार आहेत. डिजिटल मीडियासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याच शृंखलेत २१ जून रोजी सुरेश भट सभागृहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत डॉ. उदय निरगुडकर हे घेतील. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नागपूर महापालिकेने घेतलेल्या समाजकल्याणकारी निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, घर चलो अभियानांतर्गत प्रत्येक घरापर्यंत पोहोचले जाईल. शहरातील विविध उद्याने, चौक आणि मॉलमध्ये चर्चा आयोजित करून ११ वर्षांच्या कार्यकाळावर संवाद साधण्यात येईल, असे तिवारी यांनी सांगितले. यावेळी गिरीश व्यास, माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, अनिल सोले, माजी खासदार अजय संचेती उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष कार्यक्रम

  • केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या कारकिर्दीची माहिती देण्यासाठी शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये छायाचित्र प्रदर्शन भरवणार.
  • केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सर्व समाजकल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी २० मंडळांमध्ये शिबिरे.
  • समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी सरकारच्या कामगिरीवर समाज माध्यमातून चर्चा.
  • शहरातील विविध उद्यानांमध्ये आणि विविध चौकांमध्ये ११ वर्षांच्या कारकिर्दीवर संवाद.
  • २१ जून रोजी दुपारी १२ वाजता सुरेश भट सभागृहात ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी थेट संवाद साधतील.

नव्या पिढीला आणीबाणीचा इतिहास सांगणार

काँग्रेस सरकारने आणीबाणी लागू करून संविधानाचा अपमान केल्याचा आरोप दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केला. त्यामुळे काँग्रेसच संविधानाची खरी मारेकरी असून नव्या पिढीला ही सत्यता पटवून देण्यासाठी आणिबाणीच्या दिवशी यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच आणीबाणीमध्ये लढणाऱ्यांचा सत्कार केला जाईल. भाजप हा पक्ष संविधानाचा रक्षक असल्याचे पत्रक शहराच्या विविध भागात वाटले जाणार असल्याची माहितीही तिवारी यांनी दिली.