नागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर असलेल्या नागपुरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहे. या कामाच्या जोरावर नागपूरचा झपाट्याने विकास झाल्याचा दावा केंद्र व राज्य शासनातील सत्ताधारी पुढाऱ्यांकडून वारंवार भाषणात केला जात आहे. परंतु स्वच्छता सर्व्हेक्षणात नागपूर खूपच माघारले आहे. दरम्यान या प्रकरणात राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग उर्फ सतीश डागोर यांनी महत्वाचे भाष्य केले आहे.
नागपुरातील रवी भवन येथे शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग उर्फ सतीश डागोर बोलत होते. डागोर पुढे म्हणाले, नागपुरात सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र खोदकाम सुरू आहे. त्यामुळे येथे अस्वच्छता काही प्रमाणात दिसून येते. परंतु मागच्या वर्षीही नागपूर स्वच्छता सर्व्हेक्षणात २७ व्या क्रमांकावर होते. आताही याच क्रमांकावर कायम राबण्यात नागपुरला यश आले आहे. परंतु येत्या दोन वर्षांत नागपुरातील विकास कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण होण्याची आशा आहे. नागपुरातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या ताकदीवर झटपट विकास होत आहे. त्यामुळे दोन वर्षानंतर देशातील पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर होण्यापासून नागपुरला कोणीही वाचवू शकणार नाही. पत्रकार परिषदेला समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलैला…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सफाई कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांच्यापर्यंत योजना पोहोचाव्या यासाठी २२ जुलैला सकाळी १० ते ६ या वेळेत टिंबर मार्केट परिसरातील पाटीदार भवन येथे लाभार्थी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. शिबिराचे उद्घाटन पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होईल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर दयाशंकर तिवारी, प्रमुख अतिथी म्हणून आमदार संदीप जोशी, कृष्णा खोपडे, मोहन मते, प्रवीण दटके आदी उपस्थित राहतील. यावेळी महिला सफाई कर्मचाऱ्यांना साड्यांचे वितरण, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून २०५ सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र तसेच गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करणार असल्याचेही पत्रकार परिषदेत डागोर यांनी सांगितले.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महानगरपालिका, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जिल्हा उद्योग केंद्राचे सहकार्य लाभल्याचीही माहिती त्यांनी दिली.