नागपूर : दहशतवादाचे केंद्र असलेल्या पाकिस्तानला कायमची अद्दल घडवत, त्याचे तुकडे करण्याची सुवर्ण संधी ऑपरेशन सिंदूरने निर्माण केली होती. मात्र ट्रम्प धार्जिण्या मोदी सरकारने ती गमावली. त्यामुळे जिंकलेले युद्ध हरण्याची वेळ देशावर आली, आणि माघार घ्यावी लागली, असा घणाघाती हल्ला करीत वंचित बहूजन आघाडीचे नेते आणि माजी खासदार ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी मोदी सरकारचे ऑपरेशन वस्त्रहरण केले.

निमित्त ठरले, फुले -आंबेडकर इंटलेक्च्युअल फोरमच्यावतीने आयोजित विशेष व्याख्यानाचे. ऑपरेशन सिंदूर आणि नंतरच्या घडामोडी हा विषय केंद्रस्थानी ठेवून कस्तुरचंद पार्क जवळील परवाना भवनच्या सभागृहात ते बोलत होते.

चालून आलेली एकही संधी सोडायची नसते, हा राजकारणातला पहिला नियम आहे, असे स्पष्ट करीत थेट विषयाला हात घालत अॅड. आंबेडकर म्हणाले, देशाच्या तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ च्या युद्धात बांगलादेशच्या रुपाने पाकिस्तानचे तुकडे करीत हे धाडस केले. अगदी तशीच सुवर्ण संधी पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने केलेल्या ऑपरेशन सिंदूरने निर्माण केली होती. दहशतवाद्यांचे केंद्र पाकिस्तानला कायमची अद्दल घडवत त्याचे पाच तुकडे करता आले असते. मात्र ट्रम्प धार्जिण्या सरकारने ही संधी गमावल्याने देशाला जिंकलेल्या युद्धातून माघार घ्यावी लागली.

या लुटूपूटूच्या लढाईत एकही मित्र राष्ट्र आपल्याला भारताच्या बाजूने उभा करता आला नाही. दुसऱ्या बाजूला जिंकलेल्या युद्धातून भारताने माघार घेतल्यानंतर अमेरिका, रशिया, चीन सारखे देश उघडपणे पाकिस्तानला पुन्हा शस्त्रपुरवत त्याला मदत करीत आहेत. तत्वाला सोडून केले जाणारे हे राजकारण देशासाठी घातक आहे. इस्त्राईल आणि इराण युद्धाचा संदर्भ देत देशातल्या धर्मांध शक्तीचे गोत्र हे हिटलरशी जुळते, असा उल्लेख करीत अॅड. आंबेडकर म्हणाले, ज्या हिटलरने ज्यू लोकांचा संहार केला, त्याच ज्यूंचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इस्त्रायलची सरकार पाठराखण करीत आहे. त्यामुळे सरकार परस्पारांचे शत्रू असलेल्या ३६ च्या आकड्याशी खेळत आहे, असेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशहित, देशसुरक्षेपेक्षा आपले महत्त्व कसे वाढेल, यावर विद्यमान नेत्यांचा कल असल्याचे विश्लेषण करीत अॅड. आंबेडकर म्हणाले, गेल्या ७० वर्षांत अमेरिका पाकिस्तानला मदत करत आहे. यापुढेही करणार आहे, हे माहित असूनही ऑपरेशन सिंदूरच्या वेळी रशियाने दिलेली मदत नाकारत भारताने अमेरिकी ट्रम्प सरकारपुढे पायघड्या टाकल्या. आज रशिया, चीन, तुर्कस्तान सारखे देश पाकिस्तानच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे निर्भयपणे वस्तुस्थिती मांडत केंद्र सरकारला प्रश्न विचारत आगामी निवडणूकीत धडा शिकविण्याची वेळ आल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी नमूद केले.