नागपूर: राज्यात ऐन दिवाळीत १३ नोव्हेंबरच्या दुपारी १२.५० वाजता विजेची मागणी घसरून २२ हजार ८७६ मेगावाॅट नोंदवली गेली आहे. शासकीय व बऱ्याच खासगी कार्यालयांना सुट्ट्या असल्याने ही मागणी घसरल्याचा अंदाज आहे.

राज्यात गेल्या आठवड्यात विजेची मागणी २८ हजार मेगावाॅटच्या जवळपास होती. त्यातच दिवाळीनिमित्त घरोघरी केलेल्या रोषणाईवर १०० ते १२५ मेगावाॅट वीज लागत असल्याचा अंदाज या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करतात. त्यामुळे वीज वापर वाढणे अपेक्षित होते. परंतु, राज्यातील काही भागात पडलेल्या पावसासोबत दिवाळीनिमित्त राज्यात शासकीय व बऱ्याच खासगी कार्यालयांना सुट्टी आहे. त्यामुळे वीज वापर कमी झाला. दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणावर मजूर त्यांच्या गावी सण साजरा करण्यासाठी जातात. त्यामुळे अनेक बांधकामेही काही दिवस बंद असतात. तर बरेच उद्योगाही या काळात कमी उत्पादन घेत असल्याने त्यांचाही वीज वापर कमी होतो.

हेही वाचा… पुण्‍यातून फरार गुन्‍हेगारांना अमरावतीत अटक

शेतीतील कृषीपंपाचाही वापर हल्ली कमी झाला आहे. त्यामुळे राज्यात विजेची मागणी सोमवारी २३ हजार मेगावाॅटहून खाली आली. परंतु, दिवाळीच्या सुट्या संपताच पुन्हा मागणी वाढण्याचा अंदाज महावितरणच्या एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर व्यक्त केला. दरम्यान, मुंबईची मागणी २ हजार ७४६ मेगावाॅट नोंदवली गेली. सहसा ही मागणी ३ हजार ते ३ हजार २०० मेगावाॅट दरम्यान नोंदवली जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वीज निर्मितीची स्थिती

राज्याला ५ हजार ८२७ मेगावाॅट वीज महानिर्मितीच्या विविध औष्णिक विद्युत प्रकल्पातून मिळत होती. तर उरन गॅस प्रकल्पातून १२२ मेगावाॅट, कोयना जलविद्युत प्रकल्पातून ३१ मेगावाॅट, सौर ऊर्जा प्रकल्पातून ७३ मेगावाॅट वीज मिळत होती. खासगी प्रकल्पांपैकी जिंदलकडून ७८२ मेगावाॅट, अदानीकडून ७४६ मेगावाॅट, आयडियलकडून १६० मेगावाॅट, रतन इंडियाकडून ७९९ मेगावाॅट, एसडब्ल्यूपीजीएलकडून ३५७ मेगावाॅट वीज उपलब्ध होत होती. तर केंद्राच्या वाट्यातूनही राज्याला ९ हजार ३१३ मेगावाॅट वीज मिळत होती.