नागपूर : वर्चुअली किंवा इकोफ्रेंडली ईद साजरी करण्यासाठी आम्ही तयार आहोत, पण त्यासाठी कोणी कोणावर दबाव टाकणे योग्य नाही, काय करायचे, काय नाही ते मुस्लिम समाज जाणतात. मंत्री नितेश राणे यांच्या सल्ल्याची आवश्यकता नाही, असा टोला राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी राणे यांना लगावला.
राणे यांनी ईदला बकरे न कापता इकोफ्रेंडली ईद साजरी करावी. बकरे कापल्याने हिंदू समाजाला त्रास होतो. तसेच त्यामुळे तणाव निर्माण होतो, असे वक्तव्य केले होते. शिवाय त्यांनी प्यारे खान टीव्हीवर बोलतात आणि समोरासमोर आले की हात जोडून उभे राहतात, अशी प्यारे खान यांची खिल्ली उडवली होती. त्यावर प्यारे खान यांनी प्रतिउत्तर दिले. त्यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला.
प्यारे खान म्हणाले, इस्लामचे जे कन्सेप्ट आहे ते एकदम क्लिअर आहेत, इस्लाममध्ये कधीही कोणावरही जोर जबरदस्ती करण्यात येत नाही. वर्चुअली ईद साजरी करण्यासाठी आम्ही तयार आहोत, मात्र कोणावर प्रेशर टाकणे योग्य नाही, काय करायचे, काय नाही ते मुस्लिम जाणतात. आमच्या समाजाची पद्धती काय आहेत ते आम्हाला माहित आहे, ते त्यांनी सांगायची त गरज नाही.
कधी कोणत्याही मुस्लिमाने होळी किंवा दिवाळी बाबत बोलले असेल तर सांगा? मुस्लिमांनी कधीही कोणाच्या सणावर टीकाटिप्पणी केली नाही. आमच्याकडे लहानपणापासून दिवाळी साजरी करतात, फटाके फोडण्यात येतात. राणे यांनी म्हटले की मी त्यांना नमस्कार करतो, तर नमस्कार करणे हे आमचे संस्कार आहेत, मित्रांना भेटल्यावर नमस्कार करणे हे आमचे संस्कार आहेत. मी गडकरी, फडणवीस यांच्यासोबत राहतो, त्यामुळे मी संस्कारी आहे.
मी चिडलो यासाठी की, ते (नितेश राणे) देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतात, त्यामुळे त्यांचे नाव खराब करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याचा उत्तर मिळेल. त्यांच्या सल्ल्याची गरज नाही, सरकार आहे ना येथे, जे येथे राहतात त्यांनी येथील कायद्याचे पालन करावे, आणि केवळ मुस्लिम समाजाचे लोक नॉनव्हेज खातात असे नाही, सगळ्या समाजाचे लोक नॉनव्हेज खातात. राणे यांनी त्यावर अभ्यास करून बोलावे, असेही प्यारे खान म्हणाले.