अकोला : देशातील केंद्र व विविध राज्यातील सरकारने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कधीच निर्णय घेतलेले नाहीत. शेतकऱ्यांचे नुकसान हेच सरकारी धोरण असल्याची घणाघाती टीका राष्ट्रीय किसान मोर्चाचे अध्यक्ष तथा शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी आज येथे केली.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून वैचारिक क्रांती घडवण्याचे प्रयत्न असून आगामी काळात देशव्यापी आंदोलन छेडण्याचे सूतोवाच त्यांनी केले. अकोल्यात लुटवापसी संवाद सभेनिमित्त आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोहरे, ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ, डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले आदींसह शेतकरी नेते उपस्थित होते.

देशामध्ये विदर्भात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होतात. दुष्काळात होरपळून जाणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळत नाही. योग्य हमीभावाअभावी शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. तो पैसा दिला तरी शेतकरी समृद्ध होतील. डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करू, असे आश्वासन सरकारने दिले होते. प्रत्यक्षात ते लागू केले नाही. दिल्लीतील सरकार शेतकरी विरोधी आहे, असा आरोप राकेश टिकेत यांनी केला.

शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आहेत. ते प्रश्न जाणून घेण्यासाठी देशातील विविध भागात दौरा करण्यात येत आहे. विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न गेल्या तीन दिवसांत जाणून घेतले. आत्महत्या हा पर्याय नाही, हे शेतकऱ्यांनी जाणून घेतले पाहिजे. या व्यवस्थेविरोधात संघर्ष करण्याची तयारी शेतकऱ्यांनी ठेवावी.

आगामी देशव्यापी आंदोलनाची रुपरेषा ठरवली जात आहे. हा दौरा आटोपल्यानंतर पुढील महिन्यात चंदीगडला सर्व शेतकरी संघटनांची बैठक होणार असून त्यामध्ये आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. सरकारी धोरणाविरोधात वैचारिक क्रांती घडवण्याचे प्रयत्न आहेत, असे राकेश टिकेत म्हणाले. आयात कर माफ केल्याने विदेशातून कापूस भारतात येईल. त्यामुळे यंदा कापसाला भाव मिळणार नसून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार असल्याचे प्रकाश पोहरे यांनी सांगितले.

दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी १३ महिने आंदोलन केले. या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांनी बलिदान दिले. त्यानंतर केंद्र सरकारने काळे कायदे वापस घेतले. हे कायदे वापस घेतले असले तरी त्यामुळे शेतकऱ्यांचे समाधान झालेले नाही, असे राकेश टिकेत यांनी सांगितले.

विरोधी पक्ष आहेच कुठे?

देशात विरोधी पक्ष आहेच कुठे? असा प्रश्न निर्माण होतो. सरकार कुणाचेही असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन केले जाईल. आंदोलनातूनच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतात. राजकारणात जाऊन निवडणूक लढण्याचा आपला विचार नाही, असे देखील राकेश टिकेत यांनी स्पष्ट केले.