नागपूर : राज्यातील सरकारला सर्वसामान्य जनतेशी काहीही देणेघेणे नाही. पुण्यात धनदांडग्याच्या मुलाने दोघांना चिरडले तर निबंध लिहून त्याला सोडून दिले. डोंबिवलीत यापूर्वी झालेल्या एका घटनेनंतर महाविकास आघाडी सरकारने हे कारखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. पण त्यानंतर आलेल्या महाभ्रष्ट युती सरकारने लाच घेऊन ते कारखाने सुरुच ठेवले, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

नागपूर येथे ते आज पत्रकारांशी बोलत होते. राज्यात दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे, काही गावांना महिना महिना पाणी मिळत नाही, जनावरांना चारा नाही, पिण्याचे पाणी नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळ आढावा बैठक घेतली पण या बैठकीला ५ पालकमंत्री गैरहजर होते. यातूनच सरकार दुष्काळावर गंभीर नाही हे स्पष्ट दिसते. मुख्यमंत्र्यांनी केवळ बैठकीचा सोपस्कार पूर्ण केला. सरकारने आचारसंहितेचे कारण सांगूनटाळाटाळ करू नये, तातडीने जनावरांना चारा, पिण्याचे पाणी व लोकांच्या हाताला काम उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

हेही वाचा…लोकसभेच्या धामधुमीत झालेल्या शेतकरी आत्महत्या दुर्लक्षित!आत्मघाताची दुर्देवी मालिका कायम!

ते पुढे म्हणाले की, राज्यातील सरकार हे असंवैधानिक आहे. या सरकारला सर्वसामान्य जनतेचे काहीही देणेघेणे नाही. गरीब लोकांचे जीव जात आहेत पण त्याकडे सरकारचे लक्ष नाही. दुष्काळाने जनता होरपळत आहे पण सरकार काहीही उपाययोजना करत नाही. पुण्यात धनदांडग्याच्या मुलाने दोघांना चिरडले तर निबंध लिहून त्याला सोडून दिले. डोंबिवलीत रासायनिक कारखान्यात स्फोट होऊन ११ लोकांचा मृत्यू झाला व ६० जण जखमी झाले. डोंबिवलीत यापूर्वी झालेल्या एका घटनेनंतर महाविकास आघाडी सरकारने हे कारखाने बंद करण्याचे आदेश दिले होते पण त्यानंतर आलेल्या महाभ्रष्ट युती सरकारने पैसे घेऊन ते कारखाने सुरुच ठेवले. लोकांचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे पण खोके सरकारला गरिबांच्या जीवाचे मोल नाही, सरकारला लाज असेल तर राजीनामा देऊन मोकळे व्हावे, असेही नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा…निवड होऊनही शेकडो शिक्षक नियुक्तीच्या प्रतीक्षेत! काय आहेत कारणे जाणून घ्या…

अभ्यासक्रमात मनुस्मृती नकोच

नवीन अभ्यासक्रमासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, अभ्यासक्रमात जर मनुस्मृतीचा समावेश केला तर ते अजिबात चालणार नाही, काँग्रेस ते कदापि खपवून घेणार नाही. सर्व तपासून यासंदर्भात पुढची पाऊले उचलू.