लोकसत्ता टीम

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, ते अन्य कुठल्याही नेत्यांचे नाव घेणार नाही तर देवेंद्र फडणवीस यांचेच नाव घेतील. मी मंत्री होतो म्हणून आमच्यावर कुठली केस करू नये, असे त्यांना वाटत असेल तर ते चूक आहे. त्यांनी चुक केली असेल तर गुन्हा दाखल होईलच. मात्र राज्यात कुठलीही घटना घडली की विरोधी पक्षाकडून देवेंद्र फडणवीस यांचेच जबाबदार म्हणून नाव घेतले जाते. उद्या महाविकास आघाडीच्या एखाद्या नेत्याच्या पायाला ठेच जरी लागली तरी ते देवेंद्र फडणवीस यांचेच नाव घेतील, अशी टीका वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे आणि तीनही पक्षाचे नेते मिळून कुठल्याही योजनेबाबत निर्णय घेत असतात. मात्र, मनोज जरांगे पाटील असो की, महाविकास आघाडीतील नेते असो, जे काही घडत आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच घडत आहे, असे म्हणून विरोधकांकडून फडणवीस यांनाच लक्ष्य केले जात आहे. ते योग्य नाही, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

आणखी वाचा-१०० वर्षे जुन्या विद्यापीठात १९ विभागांमध्ये एकही प्राध्यापक नाही, शिक्षक दिनाचे वास्तव

नागपुरात शंभर एकर परिसरात चित्रपट नगरी

नागपुरात शंभर एकर परिसरात चित्रपट नगरी उभारली जाणार आहे. विविध चित्रपट आणि मालिकांसाठी याचा उपयोग होईल. विदर्भात ताडोबा, पेंच अभयारण्यासह निसर्गाने मुक्त उधळण केलेले विविध स्थळे आहेत. नागपूर विभागाला झाडीपट्टीचा मोठा वारसा आहे. त्यामुळे येथे उत्तम पणे काम होईल, असेही मुनगंटीवार म्हणाले.

तिकिटासाठी काही नेते भाजपा सोडून जातील, पण…

भाजपामधील काही नेते विधानसभेच्या तिकिटासाठी पक्ष सोडून जातील, मात्र आमची सत्ता आल्यावर ते परत आमच्यासोबत येतील. चिंता करून नका. योग्यवेळी योग्य निर्णय होतील, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. गडचिरोली जिल्ह्यात दुर्दैवी स्थिती आहे. काँग्रेसला पन्नास वर्षे महाराष्ट्रात सत्तेची संधी मिळाली. इतके वर्षे राज्य करून गडचिरोली अजूनही अविकसित राहिला. काँग्रेसने राज्याची वाट लावली. खोटे नरेटिव्ह पसरवत ते राजकारण करीत आहेत. आम्ही रडणारे नाही तर कुठल्याही परिस्थितीत लढणारे नेते आहो, असे मुनगंटीवार म्हणाले.

आणखी वाचा-दीक्षाभूमीला कोणत्या नियमाच्या अंतर्गत जमीन देता येईल? उच्च न्यायालयाची विचारणा…

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार खंबीरपणे उभे राहील. काही लोक अफवा पसरवतात. ज्यांना निवडणूक शास्त्र आणि खुर्चीशास्त्र माहीत आहे, त्यांना अर्थशास्त्र कळत नाही. त्या लोकांपासून सावध राहिले पाहिजे, अशी टीकाही मुनगंटीवार यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाडक्या बहिणींना पैसे मागितल्यास कारवाई…

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेबाबत विरोधकांकडून टीका केली जात आहे. ही योजना बंद करण्यासाठी ते आटापिटा करत आहेत. या योजनेसाठी पैसे मागण्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे आल्या तर कारवाई केली जाईल, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे सरकारी तिजोरीवर कुठलाही ताण वाढलेला नाही. बहिणींना मदत करताना अडचणी येतात. मात्र, विरोधी पक्ष राज्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोपही मुनगंटीवार यांनी केला.