नागपूर : राज्यातील सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात आहेत. अधिवास क्षेत्र कमी, वाघांची संख्या अधिक आणि पर्यटनाचा भार यामुळे व्याघ्र प्रकल्पाइतकेच वाघ बाहेरदेखील वाढले आहेत. परिणामी, लगतच्या गावांमध्ये मानव-वाघ संघर्ष गंभीर वळणावर आहे. मात्र, या संघर्षावर ठोस उपाययोजनेबाबत भाष्य करण्याऐवजी वनमंत्र्यांनी पंचतारांकित पर्यटनावर अधिक भर दिल्याने व्याघ्र संवर्धकांनी आश्चर्य व्यक्त केले.

वन विभागातर्फे चंद्रपूर येथील वन अकादमी येथे पाच आणि सहा जूनला राष्ट्रीय स्तरावरील ‘वनशक्ती २०२५’ ही महिला परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत वनमंत्री गणेश नाईक बोलत होते. व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा आणि बफर क्षेत्रात पंचतारांकित हॉटेल्सचे नियोजन केले जात आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील साखळी हॉटेल्स या ठिकाणी आणण्यासाठी त्यांना आमंत्रित करणारे प्रस्ताव तयार करा, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावातील नागरिकांची जीवनशैली सुधारली पाहिजे. त्यांना रोजगार मिळायला हवा, या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. या व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेर पंचतारांकित हॉटेल्स असायला हवेत आणि त्या दृष्टीने प्रस्ताव तयार केले जातील, असेही नाईक यांनी सांगितले.

प्रवेशद्वारावरच विश्रामगृह

ताडोबा बफरच्या बाहेरदेखील आंतरराष्ट्रीय हॉटेल्स उघडण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील विश्रामगृह बांधले जाईल. यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओढा वाढेल. तसेच भारतातील पर्यटकदेखील मोठ्या प्रमाणात येतील. गरज भासल्यास जंगल सफारीसाठी पर्यटन प्रवेशद्वारांची संख्या व पर्यटकांच्या फेऱ्यासुद्धा वाढवण्यात येतील. यातून रोजगार निर्माण होईल, असा दावाही नाईक यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवीन वाहने; चालक महिलाच

वन खात्यातील वाहने जुनी झाली आहेत. दहा वर्षे जुनी वाहने भंगारात काढून नवीन वाहने आणली जाणार आहेत. जंगल सफारीसाठी असणारी वाहनेदेखील आता बदलून नवीन वाहने आणण्यात येतील आणि त्यात वाहनचालक म्हणून ५१ महिला असतील, असेही नाईक यांनी सांगितले.